गोंदिया - विद्युत बिल न भरल्याने भारतीय दूर संचार निगमला (बीएसएनएल) महावितरण विभागाने पुन्हा जोराचा झटका दिला आहे. महावितरणने जिल्ह्यातील बीएसएनएलच्या शहर आणि ग्रामीण भागातील १२५ टॉवर पैकी ७० टॉवर बंद केले. तर काही एक्सचेंजची बत्ती ही गुल केली आहे. बीएसएनएलची सुमारे ४४ लाखांच्या घरात थकबाकी असल्याने महावितरणने हे पाऊल उचलले आहे. मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू आहे. वीज बिलांची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. यानंतर बीएसएनएलकडून पैसे भरले जातात. मात्र, काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी लागते.
यंदा महावितरण विभागाने गोंदिया, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यात बीएसएनएलला दणका दिला आहे. महावितरणने १२५ टॉवर पैकी ७० टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे संपुर्ण तालुक्यातच बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. तसेच इंटरनेट पूर्णपणे बंद झाल्याने याचा फटका बँकांनाही बसत आहे. कधी काळी बीएसएनएलचे सीम किंवा टेलीफोन कनेक्शन घेण्यासाठी नागरिकांना प्रतिक्षेत रहावे लागत होते. मात्र, खासगी कंपन्या बाजारात आल्याने त्यातच शासनाने बीएसएनएलकडे दुर्लक्ष झाल्याने बीएसएनएलकडे पाठ फिरवली आहे.
हेही वाचा -..न भरलेल्या १ लाख ४४ हजारांचे बिंग फुटू नये म्हणून जाळले एटीएम