गोंदीया -राज्यातील मातीने तयार करण्यात आलेले जिल्ह्यातील प्रसिद्ध ईटीयाडोह धरण सुटीच्या दिवशी पर्यटकांनी फुलुन जाते. सुट्याच्या दिवसामध्ये हजारो पर्यटक या धारणाला भेट देतात. या वर्षी पर्यटकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
ईटीयाडोह धरण पर्यटकांनी फुलले, हजारो पर्यटकांची ईटीयाडोह धरणास भेट निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे 2013 पासून हा बांध ओव्हर फ्लो झालाच नाही. यंदा धरणाची जलसंचय पातळी 35 फुटावर पोहचल्याने धरण ओव्हर फ्लो होण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातूनही पर्यटक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येतात. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असलेल्या पर्यटन स्थळांकडे आकर्षित होतात. निसर्गाच्या कुशीतील तालुक्याच्या पर्यटनासाठी पर्यटक बेत आखतात. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, प्राचीन प्रतापगड किल्ला व हिंदू मुस्लीम एकात्मतेची ओळख असलेली महादेव पहाडी, ख्वाजा उष्मान गणी हरुणी यांचा दर्गा, जवळच असलेली तिबेटीयन बांधवांची वसाहत व बुद्ध स्तूप, बोनडगाव देवी येथील कुलस्वामीनी माता गंगा जमुना हे तालुक्यातील प्रमुख पर्यटनाचे केंद्र आहे. या ठिकाणी ही पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
परिसरातील प्रमुख केंद्र ईटीयाडोह धरण आहे. हे धरण पर्वतांच्या मधोमध आहे. यामुळे कुणीतरी जादूगाराने जणू जादू करूनच धरण निर्माण केल्याचाही भास होतो. भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचित करणारे हे धरण आज घडीला शासनाच्या दुर्लक्षित पणाचा बळी ठरत आहे. हे स्थळ शासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनपणाने पर्यटकांना मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने जिल्हा भरातील जनतेची व शेतकऱ्यांची तहान भागवणाऱ्या स्थळी शुद्ध पिण्याचे पाणी, स्वछता गृहांची वानवा असल्याने महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. इथे खूप भव्य रेस्ट हाऊस आहे. मात्र, रेस्ट हाउसमधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. रेस्ट हाउसमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. येणाऱ्या पर्यटकांसाठी राहाण्याची, खाण्याची आणि पार्किंगची सुविधा नसल्याने पर्यटक या ठिकाणी येऊन सुविधा नसल्याने आपले रोष जनप्रतिनिधी व शासनाकडे व्यक्त करत असतात.
26 जानेवारी 2018 ला धरणाच्या सांडव्यात सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुण बुडाले. त्या वेळी काही काळापुरता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. मात्र, या ठिकाणी प्रसाशनाने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या गोष्टी लावलेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा कोणतीही मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धरणाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने असामाजिक तत्वाचा त्रास वाढत चालला आहे. याचा त्रास येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे.
धरण परिसरात पर्यटनाला भरपूर वाव असल्याने येथील बेरोजगार युवकांना रोजगराच्या संधी उपलब्ध करून देता आल्या असत्या. मात्र, राजकीय इछा सक्तीचा अभाव असणाऱ्या लोकप्रतिनिधी मुळे रोजगार ठप्प आहे. धरणात बारमाही बोटिंग सुरू ठेवणे सहज शक्य आहे. मत्स्यव्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी या सारखे दुसरे ठिकाण नाही. जंगल सफारी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. हॉटेल, रिसॉर्ट या सारख्या व्यवसायांना संधी आहे. फक्त गरज आहे, शासना ने या ठिकाणी लक्ष देण्याची. त्यामुळे पर्यटन धोरणातून या स्थळाचा विकास होण्यासाठी मोठी मद्दत होणार आहे.