गोंदिया - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ जानेवारीच्या मध्यरात्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून १० नवजात बालकांचा होरपाळून मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. दोषींवर कारवाई करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी सात डॉक्टर व नर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र कोणावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आता तब्बल 39 दिवसांनंतर दोन कंत्राटी नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का? असा सवाल माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, भंडारा जळीतकांड प्रकरणी दोन कंत्राटी नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा मुख्यमंत्री भंडाऱ्याला आले होते, तेव्हाच हे ठरलं होतं की, छोट्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून, बड्या कर्मचाऱ्यांना वाचवायचे, असा सनसनाटी आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. बावनकुळे हे गोंदियात आज भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंचाच्या सत्कार कार्यक्रमाला आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पटोलेंचे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे