गडचिरोली -तेलंगणा राज्यातील मेडीगट्टा प्रकल्पातून पाणी सोडताना व अडवताना गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्व सूचना द्यावी, जेणेकरुन सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांतील रहिवाशांना वेळेत सूचना देता येईल व त्यांना सुरक्षितस्थळी हलवता येईल, अशी सूचना गडचिरोलीचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोसीखुर्द धरणाच्या पूरस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गेल्यावर्षी अचानक पाणी सोडल्याने व जिल्हा प्रशासनाला पूर्व सूचना न दिल्याने गोसीखुर्दमध्ये पाणी वाढले व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी शिंदे यांनी सूचना केल्या आहेत.
पाणी सोडताना व अडवताना गडचिरोली जिल्हा प्रशासनाला कळवावे
गेल्यावर्षी मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी वैनगंगा, गोसीखुर्दमध्ये वाढल्याने गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडावे लागले. परिणामी वैनगंगा व प्राणहिता या दोन नदी काठावरच्या गावांना फटका बसला होता. गोसीखुर्दमधून पाणी सोडल्यावर ते पाणी गडचिरोलीत येण्यासाठी बारा ते पंधरा तास लागतात. त्यामुळे मध्यप्रदेश व तेलंगणा सरकारने पाणी सोडताना व अडवताना गडचिरोली जिल्हा प्रशासनाला कळवावे. त्यामुळे नियोजन योग्य पध्दतीने करता येईल, असे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तेलंगणा प्रशासन व आपल्या प्रशासनात समन्वय ठेवणे गरजेचे आहे.