महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 10, 2019, 12:18 PM IST

ETV Bharat / state

एटापल्ली येथे तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलन; गावांमध्ये दारू व खर्राबंदी करण्याचे केले आवाहन

'मुक्तिपथ'च्या माध्यमातून गावागावात गाव संघटनांद्वारे दारू आणि खर्राबंदीसाठी प्रयत्नशील असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी एटापल्ली येथे गोटूल सांस्कृतिक भवनात तालुका मुक्तिपथ कार्यालयाद्वारे तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ. बंग बोलत होते.

एटापल्ली येथे तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलन

गडचिरोली- आदिवासीबहुल एटापल्ली तालुक्यात मोहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. आदिवासी संस्कृतीचा भाग समजली जात असल्याने मोहाची दारू घरोघरी बनवली जाते, पण याच दारूमुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या भागात व्यसनमुक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रत्येक गावांमध्ये दारू आणि खर्राबंदी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

एटापल्ली येथे तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलन; गावांमध्ये दारू व खर्राबंदी करण्याचे केले आवाहन

स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी दारू व खर्रा या दोन्ही पदार्थांना तालुक्यातून हद्दपार करणे आवश्यक आहे. संविधानानेत कायद्याद्वारे संसदेलाही नसतील तेवढे अधिकार या गावांना दिले आहेत. या कायद्याचा वापर करून ग्रामसभेद्वारे निर्णय घेऊन दारू आणि खर्रा गावातून हद्दपार करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.

'मुक्तिपथ'च्या माध्यमातून गावागावात गाव संघटनांद्वारे दारू आणि खर्राबंदीसाठी प्रयत्नशील असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी एटापल्ली येथे गोटूल सांस्कृतिक भवनात तालुका मुक्तिपथ कार्यालयाद्वारे तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ. बंग बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरामण वरखडे, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, संवर्ग विकास अधिकारी किशोर गझलवार, पोलीस उपनिरीक्षक डहाके, पं. स. सभापती बेबीताई लेखामी उपस्थित होते.

संमेलनाचा उद्देश समजावून सांगताना डॉ. बंग म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वात मागास गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली हा उत्पन्नाची साधने अत्यल्प असल्याने अतिमागास तालुका समजला जातो, पण वनांनी आणि गोंडी संस्कृतीने हा तालुका तितकाच समृद्ध आहे. मोहफुलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन येथे होते. त्याचे अनेक पारंपारिक उपयोग प्राचीन काळापासून आदिवासी समाज करत आला आहे, पण या काही वर्षांत दारू बनवण्यासाठी मोहफुलाचा वापर वाढल्याने त्याचे इतर उपयोग आपण विसरून गेलो आहोत. त्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या दोन्ही पदार्थावर जिल्ह्यात बंदी आहे. तरीदेखील याचा वापर होत असल्याने मुक्तिपथच्या माध्यमातून दारू व तंबाखूवर गावांनीच बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

एटापल्लीतील ५० च्यावर गावांनी खर्राबंदी साध्य केली आहे. ही खूप आनंदाची बाब असून आता संपूर्ण तालुक्यातील खर्रा आणि दारू हद्दपार करण्यासाठी गाव संघटनांनी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. बंग यांनी केले. यावेळी खर्रा या पदार्थामुळे होत असलेले नुकसान सांगणारा यमराजाचा फास हा चित्रपट उपस्थितांना दाखवून त्यावर चर्चाही करण्यात आली. तालुक्यातील ४२ गावातील २०० कार्यकर्ते या संमेलनात सहभागी झाले होते.

मोहफुलाचे इतर उपयोग वाढवा -

मोहफुलापासून सरबत, लाडू, चिक्की यासह इतरही अनेक पदार्थ बनवता येतात. बचत गटांद्वारे ते पदार्थ बनवायला सुरुवात झाली असून बाहेर ठिकाणी याला खूप मागणी आहे. अशा पदार्थांची अधिकाधिक निर्मिती करून दारूसाठी मोहफुल मिळूच देऊ नका. मोहफुलाचे पारंपरिक उपयोग नव्याने करायला शिका, असे उपस्थितांना सांगण्यात आले.

दारू व खर्राबंदीसाठी ‘पोलो’ ठेवा -

आदिवासी समाजात आठवडी सुट्टीसारखा पोलो ठेवला जातो. या दिवशी सर्व व्यवहार बंद असतात. या पोलोचा आधार घेत मुक्तिपथद्वारे गावांना खर्राबंदीचा पोलो पाळण्याचे आवाहन करण्यात आले. गावांनी याला दुजोरा देत खर्राबंदीचे पोलो पाळले. एवढेच नवे तर खर्राबंदीसाठी खास पोलो ठेवून अशा दिवशी विशेष ग्रामसभा बोलावून खर्राबंदीचा ठराव घेण्यात आला. परिणामी तालुक्यातील ५० च्यावर गावांमध्ये आज खर्राविक्री बंद आहे. असाच पोलो आता दारूबंदीबाबत पाळण्याविषयी माहिती संमेलनाच्या माध्यमातून देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details