महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 30, 2019, 3:39 PM IST

Updated : Aug 30, 2019, 6:49 PM IST

ETV Bharat / state

गडचिरोली विधानसभा आढावा: भाजप गड राखणार की काँग्रेसला मिळणार गतवैभव?

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिलेला हा मतदारसंघ २०१४च्या मोदी लाटेत भाजपकडे गेला. डॉ. देवराव होळी पहिल्यांदाच गडचिरोली मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढले. त्यांनी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांचा ५१,९०५ मतांनी पराभव केला.

डॉ. देवराव होळी आणि डॉ. नितीन कोडवते

गडचिरोली -एकेकाळी गडचिरोली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, आता या बालेकिल्ल्यात भाजपची पकड मजबूत झाली आहे. या मतदारसंघात यावेळीही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडचिरोली मतदारसंघात भाजप गड राखणार की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळणार? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

गडचिरोली विधानसभा आढावा: भाजप गड राखणार की काँग्रेसला मिळणार गतवैभव?

गडचिरोली विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिलेला हा मतदारसंघ २०१४च्या मोदी लाटेत भाजपकडे गेला. सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन डॉ. देवराव होळी पहिल्यांदाच गडचिरोली मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांचा ५१,९०५ मतांनी पराभव केला होता. मात्र यावेळी त्यांना पक्षातून उमेदवारीसाठी फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी खासदार अशोक नेते यांचे तिकीट कापण्यासाठी दबाव गट बनवला होता. त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता त्यांना तिकीट मिळू नये, यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास निष्ठावंत कार्यकर्ता आणि आदिवासी समाजसेवक म्हणून ओळख असणारा चेहरा प्रकाश गेडाम यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याने यावेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पण काँग्रेसने आपला दावा सोडलेला नाही. लोकसभेसाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे डॉ. नितीन कोडवते आता विधानसभेसाठी तरी तिकीट मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. लोकसभेसाठी डॉ. कोडवते यांनी इच्छा दर्शविली आणि त्यांना विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पाठबळ दिले. त्यामुळे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मात्र, डॉ. नामदेव उसेंडी यांनी थेट दिल्ली गाठून आपली लोकसभेची उमेदवारी निश्चित केली होती. तेव्हा नितीन कोडवते यांना विधानसभेत संधी देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आता विधानसभेची तरी तिकीट मिळावे, या आशेवर असणारे कोडवते यांना खरच तिकीट मिळणार का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्यांच्यासाठी जोर लावणार का? जर अस झाले तर नक्कीच या मतदार संघात मोठी चुरस बघायला मिळणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपचे अशोक नेते यांना १ लाख ३ हजार तर काँग्रेसचे डॉ. उसेंडी यांना ७९ हजार २०० मते पडली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे गजबे यांना ११ हजार ७०० मते पडली होती. राज्यात वंचित बहुजन आघाडीने कुणासोबत जायचे अद्याप निश्चित केले नसल्याने या ही निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची महत्वपुर्ण भूमिका राहणार आहे. एकूणच उमेदवारी कुणाला मिळेल, हे अद्याप निश्चित नसल्याने तिकिटासाठी चांगलीच रस्सीखेच बघायला मिळणार आहे.


मतदारसंघातील प्रश्न

  • ओबीसींवरील आरक्षण संदर्भात अन्याय दूर झाला नाही
  • ग्रामीण भागातील आरोग्यसेवा आजही सलाईनवर
  • चिचडोह बरेजचे काम पूर्ण, पण सिंचनाची प्रतीक्षा कायम
  • कोनसरीच्या लोहखनिज प्रकल्पाची उभारणी हवेत विरली
  • मुख्य रस्ते खड्डेमय, सिमेंटीकरणाचे कामही कासवगतीने
  • रोजगारासाठी करावी लागते भटकंती
  • देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रश्न रेंगाळलेलाच
Last Updated : Aug 30, 2019, 6:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details