महाराष्ट्र

maharashtra

नक्षलवादी संघटना आक्रमक ; 10 नोव्हेंबरला गडचिरोलीत 'जिल्हा बंद'चे आवाहन

18 ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलिसांनी धानोरा तालुक्यातील किसनेली जंगल परिसरातील नक्षलवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला चढवला. यात तीन महिलांसह दोन पुरुष ठार झाले. त्याच्या निषेधार्थ नक्षलवादी संघटना 'जिल्हा बंद' पुकारणार आहेत.

By

Published : Nov 9, 2020, 3:55 PM IST

Published : Nov 9, 2020, 3:55 PM IST

naxalites from gadchiroli
नक्षलवादी संघटना आक्रमक ; 10 नोव्हेंबरला गडचिरोलीत 'जिल्हा बंद'चे आवाहन

गडचिरोली - 18 ऑक्टोबर रोजी धानोरा तालुक्यातील किसनेली जंगल परिसरात स्थानिक पोलिसांच्या सी-60 दलाची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यामध्ये पाच नक्षलवादी ठार झाले होते. त्याचा निषेध म्हणून नक्षलवादी संघटनेने 10 नोव्हेंबरला 'जिल्हा बंद'चे आवाहन केले आहे. यासाठी उत्तर गडचिरोली डिव्हिजन कमिटी माओवादी संघटनेचे प्रवक्ता पवन याने पत्रक काढले आहे.

10 नोव्हेंबरला गडचिरोलीत 'जिल्हा बंद'चे आवाहन

18 ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलिसांनी धानोरा तालुक्यातील किसनेली जंगल परिसरातील नक्षलवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला चढवला. यात तीन महिलांसह दोन पुरुष ठार झाले. गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने जाणीवपूर्वक हल्ला चढवून आमच्या साथीदारांना ठार केल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला. या घटनेचा निषेध करत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 10 नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवादी संघटनेने पत्रकाद्वारे केले आहे. सी-60 पथकाला शिक्षा देण्यासाठी विविध संघटनांनी जिल्हा बंद सफल करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

खोट्या चकमकींची परंपरा

जल, जंगल, जमीन आदिवासींची संपत्ती असताना दलाल-नोकरशाह आदिवासींची पिळवणूक करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सी-60 पथकाला खुली सूट असल्याने ते खोट्या चकमकी घडवून आणत आहेत. यामध्ये आनेकांना ठार करण्यात आल्याचा आरोप नक्षलवादी संघटनांनी केलाय. ही परंपरा मागील तीन दशकांपासून सुरू असून चालू वर्षात सिनमट्टी, दुड़ेपल्ली, दोड्दा, तर गतवर्षी 29 नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील मोरोमेट्टा-नेलगुडा ग्रामवासी प्रकाश मुहंदा व राजु पुसाली तर गुडुरवाहीचे रामको, शिल्पा यांना पकडून खोटी चकमक घडवली; आणि त्यांची हत्या केल्याचा आरोप नक्षलवादी संघटनेने केला आहे. 2017 मध्ये कल्लेडा, 2018 मध्ये कसनुर-तूमिरगुंडा येथेही अशाच प्रकारे हत्याकांड घडवण्यात आले, असे नक्षलवाद्यांच्या पत्रकात अंतर्भूत आहे.

या घटनांचा निषेध करण्यासाठी 'जिल्हा बंद' यशस्वी करण्याचे आवाहन पत्रकाद्वारे नक्षलवादी संघटनेने केले आहे. या पत्रात 'महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद' असा उल्लेख असून 'प्रवक्ता, पवन - उत्तर गडचिरोली डिव्हिजन कमिटी माओवादी' असे लिहिण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details