महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 24, 2019, 8:19 PM IST

ETV Bharat / state

गडचिरोली-चिमूर लोकसभा : वंचित बहुजन आघाडीने बिघडवले काँग्रेसचे गणित

आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजप या पारंपरिक प्रतिस्पर्धींमध्ये काट्याची टक्कर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निकाल हाती आले तेव्हा भाजपचे अशोक नेते यांनी ७६ हजार मते घेत एकतर्फी विजयी झाले व सलग दुसऱ्यांदा लोकसभेत एन्ट्री केली.

संपादीत छायाचित्र

गडचिरोली- आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजप या पारंपरिक प्रतिस्पर्धींमध्ये काट्याची टक्कर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निकाल हाती आले तेव्हा भाजपचे अशोक नेते यांनी ७६ हजार मते घेत एकतर्फी विजयी झाले व सलग दुसऱ्यांदा लोकसभेत एन्ट्री केली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. रमेशकुमार गजबे यांनी १ लाख ११ हजार मते घेत एक्स फॅक्टर ठरल्याने काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांचा पराभव झाला, असे आता राजकीय पंडितांकडून बोलले जात आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे विश्लेषण केले आहे आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी

निवडणुकीपूर्वी ही निवडणूक तिरंगी होईल, असे चित्र होते. मात्र, खरी लढत काँग्रेस व भाजपमध्येच होती. तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसकडून बरीच रस्सीखेच झाली. अखेरच्या क्षणी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे पक्षाअंतर्गत बराच वाद झाला. तर भाजपकडूनही उमेदवारीसाठी अशोक नेते यांना डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांनाही उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळेसही भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होईल, असे चिन्ह होते.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या २५ व्या फेरीपर्यंत भाजपचे अशोक नेते आघाडीवर राहिले. नेतेंनी पहिल्या फेरीमध्ये मिळविलेली दोन हजार मतांची आघाडी २५ व्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने ते 76 हजार मतांनी विजयी झाले. तर काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांना एकदाही अशोक नेते यांच्यावर आघाडी घेता आली नाही.

या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाल्यास डॉ. उसेंडी यांचा अतिआत्मविश्वास, पक्षांतर्गत असलेली गटबाजी आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांनी घेतलेली एक लाख ११ हजार मते उसेंडी यांच्या पराभवास कारणीभूत आहेत. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील अहेरी विधानसभा क्षेत्रात अशोक नेते यांना ६३ हजार ९०० तर उसेंडी यांना ७० हजार मते मिळाली. या विधानसभा मतदारसंघात उसेंडी यांनी सहा हजार मतांची आघाडी घेतली. मात्र चिमूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली, आमगाव व आरमोरी या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये अशोक नेते आघाडीवरच राहिले.

नेते यांनी आमगाव विधानसभा क्षेत्रांमध्ये ९४ हजार, आरमोरी ८९ हजार, गडचिरोलीत १ लाख ३ हजार, अहेरी ६३ हजार, ब्रह्मपुरी ८९ हजार तर चिमूर विधानसभा क्षेत्रातून ७७ हजार मते घेतली. तर २२४६ टपाली मते मिळाली. त्यांचे विरोधक नामदेव उसेंडी यांनी आमगाव विधानसभा क्षेत्रांमध्ये ७६ हजार, आरमोरी ७२ हजार, गडचिरोलीतून ७९ हजार, अहेरी ७० हजार, ब्रह्मपुरी ७६ हजार, तर चिमूर विधानसभा क्षेत्रातून ६५ हजार मते घेतली. तर २०५६ टपाली मते मिळाली.

तिसर्‍या क्रमांकावर राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेशकुमार गजबे यांनी आमगाव विधानसभा क्षेत्रातून २६००, आरमोरी १२ हजार ७००, गडचिरोली ११ हजार ७००, अहेरी ५ हजार २००, ब्रह्मपुरी २७ हजार व चिमूरमधून ५० हजार ९०० मते घेतली. त्यांना ७३२ टपाली मते मिळाली. तर नोटालाही मोठ्या प्रमाणात मते पडली. आमगाव विधानसभा क्षेत्रातून २५५०, आरमोरीतून ४११४, गडचिरोली ५२५३, अहेरी ६९८४, ब्रह्मपुरी २५२१ व चिमूर विधानसभा क्षेत्रात २९८७ असे २४ हजार ५९९ मते नोटाला पडली. १०३६ मते अवैध ठरली.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून पाच उमेदवार रिंगणात होते. मात्र अशोक नेते, नामदेव उसेंडी व रमेशकुमार गजबे हे तीन उमेदवार वगळता बहुजन समाज पार्टीचे हरिचंद्र मंगाम व आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे यांना फारशी मते मिळवता आली नाही. मंगाम यांना २८ हजार १०४ तर नन्नावरे यांना केवळ १६ हजार ११७ मते मिळाली. एकुणच पक्षांतर्गत असलेली गटबाजी, आपणच निवडून येणार म्हणून अतिआत्मविश्वास आणि एक्स फॅक्टर ठरलेले वंचित बहुजन आघाडीचे रमेशकुमार गजबे यांनी घेतलेली व नोटाला पडलेली मते काँग्रेसचे उसेंडी यांच्या पराभवाला जबाबदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेसचा हा पराभव नक्कीच विचारमंथन करायला लावणारा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details