धुळे- पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटून आलेला भारतीय सैन्य दलातील जवान चंदू चव्हाण याने सैन्य दलातील त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. चंदू चव्हाण याने आपला राजीनामा डी.एम रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. पाकिस्तानातून सुटून आल्यापासून सैन्य दलाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, मला वाईट वागणूक मिळत असल्याचे सांगत या त्रासाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे चंदू चव्हाण याने सांगितले आहे.
चंदू चव्हान हा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावातील रहिवासी आहे. तो भारतीय सैन्य दलातील ३७ राष्ट्रीय रायफल्सचा जवान आहे. त्याने भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर त्याला भारतात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या घटनेच्या चौकशीदरम्यान चंदूने भारतीय लष्करी आस्थापनांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन आपण पाकिस्तानविरोधातील संतापातून हे कृत्य केल्याचे सांगितले होते.
हेही वाचा-धुळे: शिरपूर तालुका पोलिसांकडून 72 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त