महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 10, 2021, 9:00 PM IST

Updated : Feb 10, 2021, 10:27 PM IST

ETV Bharat / state

बाळूभाऊला सरपंच करण्यासाठी गाव एकवटला; महिला आरक्षणावर महिला सदस्यांनीच घातला बहिष्कार

बाळू वडस्कर यांना सरपंच करण्यासाठी गाव एकवटले आहे. या गावात महिला आरक्षणावर महिला सदस्यांनी बहिष्कार घातला आहे.

village has come together to make Balu Vadaskar Sarpanch
बाळूभाऊला सरपंच करण्यासाठी गाव एकवटला; महिला आरक्षणावर महिला सदस्यांनीच घातला बहिष्कार

चंद्रपूर - राजकारण म्हटले तर त्यात प्रतिस्पर्धा ही आलीच. पदाची खुर्ची मिळविण्यासाठी साम, दाम, दंड भेद या सर्व आयुधांचा यथेच्छ वापर येथे होतो. मग निवडणूक लोकसभेची असो की ग्रामपंचायतीची. मात्र, चुनाळा हे गाव याला अपवाद ठरले आहे. या गावात महिलेसाठी सरपंचपद राखीव असताना निवडून आलेल्या सातही महिला सदस्यांनी सरपंचपदावर बसण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कारण सरपंचापदावर त्यांना केवळ आणि केवळ बाळू वडस्कर हेच व्यक्ती बघायचे आहेत. ही केवळ निवडून आलेल्या महिला सदस्यांची नव्हे तर सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे बाळूभाऊ वडस्कर यांना सरपंच करण्यासाठी सारा गाव एकवटला आहे.

बाळूभाऊला सरपंच करण्यासाठी गाव एकवटला; महिला आरक्षणावर महिला सदस्यांनीच घातला बहिष्कार

गावकऱ्यांचा विश्वास आणि पैकीच्या पैकी उमेदवार विजयी -

चुनाळा गावात बाळू वडस्कर हे नाव घरोघरी परिचत आहेत. गावकऱ्यांच्या मदतीला वेळोवेळी धावून जाणारे, अडीअडचणीत मदत करणारे, गावकऱ्यांना येणाऱ्या समस्येतुन तोडगा काढणारे अशी ख्याती त्यांची बाळूभाऊ यांची आहे. गाव आणि गावकऱ्यांची नाडी बाळूभाऊ यांनी ओळखली आहे. यापूर्वी त्यांनी उपसरपंचपद देखील भूषविले आहे. त्यामुळे गावाचा विकास तेच योग्य करू शकतात असा विश्वास गावकऱ्यांना होता. त्यांच्याच मार्गदर्शनात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल तयार करण्यात आले. ग्रामपंचायतींची निवडणूक 13 जानेवारीला पार पडली तर निकाल 15 जानेवारीला घोषित करण्यात आला. तो अपेक्षित असाच होता. संपूर्ण गावकऱ्यांनी बाळूभाऊंवर विश्वास टाकत त्यांच्या पॅनलचे 13 पैकी 13ही उमेदवार निवडून आणले. यामध्ये 7 महिला आणि 6 पुरुष सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये जया नीखाडे, संतोषी साळवे, संतोषी निमकर, वंदना पिदूरकर, कोमल काटम, अर्चना आत्राम, उषा करमरकर, बाळनाथ वडस्कर, राजू किन्हीकर, राकेश कार्लेकर, रवी गायकवाड, दिनकर कोडापे, सचिन कांबळे यांचा समावेश आहे.

गावकऱ्यांच्या पदरी निराशा -

यापूर्वी सरपंच पद हे अनुसूचित जमाती पुरुष आणि त्यापूर्वी अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित होते. त्यामुळे यावेळी हे सरपंच पद खुल्या गटाला मिळेल आणि त्यावर बाळू वडस्कर हेच सरपंच होणार याबाबत सर्व निश्चिंत होते. मात्र, या आनंदावर विरजण पडले जेव्हा सरपंचपद हे सर्वसाधारण महिला सदस्यासाठी घोषित करण्यात आले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर पेच -

ज्यांच्या भरवशावर आपण निवडून आलो ते सरपंच न बनता आपण कसे बनणार असा प्रश्न महिला सदस्यांसमोर पडला. गावकऱ्यांनी देखील हीच भावना बोलून दाखवली. शेवटी गावातील 500 लोकांना घेऊन या महिला सदस्यांनी राजुरा तहसील कार्यालय गाठले. आम्हा कुठल्याही महिलांना सरपंचपद नको. आम्हाला बाळूभाऊच सरपंचपदी हवे असे निवेदन त्यांनी तहसीलदार हरीश गाडे यांना दिले. मात्र, एखाद्या आरक्षित पदावर दुसरा अन्य वर्गाचा उमेदवार बसू शकत नाही हा नियम आहे, त्यात कुठलाही तोडगा नाही. आरक्षित वर्गाला देखील समान संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे हे निवेदन बघून तहसीलदार देखील पेचात पडले. त्यांनी हे निवेदन वरिष्ठांना पाठवले. मात्र, त्याही अधिकाऱ्यांना हाच पेच पडला आहे.

गावकऱ्यांचा तोडगा -

आरक्षित पदावर अन्य उमेदवार बसण्याचे कायद्यात कुठलेही प्रयोजन नाही. तसे होणे शक्य नाही. यावर गावकऱ्यांनीच चर्चा करून तोडगा काढला. येत्या 12 फेब्रुवारीला सरपंचपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहे. यादिवशी कुठलीही महिला अर्ज भरणार नाही. उपसरपंचपदी बाळूभाऊ यांची निवड करण्यात येणार आहे. म्हणजे सरपंचपदाचा प्रभार त्यांच्याकडे येणार. हिवरे बाजार आणि राज्यातील इतर विकसित ग्रामपंचायतीत हाच तोडगा काढला जातो.

कोण आहेत बाळू वडस्कर -

बाळू वडस्कर हे अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. माणसातच देव असतो याचे संस्कार त्यांना आईवडीलांकडून मिळाले. दारात मदतीसाठी आलेला व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत निराश होऊन परतू नये असा कटाक्ष त्यांचा असायचा. यातुन बाळूभाऊ घडत गेले. लोकांची मदत करण्याचा ध्यास त्यांना लहानपणापासूनच लागला. बारावीपर्यंत शिक्षण घेतले. कोळसा खाणीत शेती गेली आज बाळूभाऊ वेकोलीच्या कोळसा खाणीत कर्मचारी आहेत. उर्वरित शेती आजही त्यांचे वडील बघतात. बाळूभाऊ यांना माजी आमदारांचे सानिध्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनात बाळूभाऊंची जनसेवा आणखी खुलत गेली. निमकर हे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेले मात्र तरीही बाळूभाऊ त्यांच्या साथीला होते. आज भाजप समर्थीत पॅनल म्हणूनच बाळू भाऊंचे सर्व उमेदवार निवडून आले. जनसेवेसाठी अर्ध्या रात्री धावून जाणारा माणूस म्हणून संपूर्ण गाव त्यांना ओळखतो. कोरोनाच्या काळात ही ओळख आणखी घट्ट झाली. कारण कोरोनाच्या अटीतटीच्या काळात चुनाळा गावात सहा रुग्ण आढळल्याने हे गाव तब्बल 21 दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या गावात नागरिकांवर उपासमारीची पाळी आली होती. मात्र, बाळूभाऊंनी आपली सर्व शक्ती पणाला लावून गावकऱ्यांची मदत केली. आजवर 55 पेक्षा जास्त वेळा त्यांनी रक्तदान केले आहे. 2020 ला एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबाला कोणतीही अडचण जाऊ नये, त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी बाळूभाऊंनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांना तो मिळाला. सरपंच झालो तर गावात वाचनालय, व्यायामशाळा, पटांगण, स्मशानभूमीचे काम प्राथमिकतेने करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

Last Updated : Feb 10, 2021, 10:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details