चंद्रपूर : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभागाकडून निवासी शाळांना अनुदान दिले जाते. मात्र मागील तीन वर्षांपासून या विभागाने नामांकित शाळांना अनुदान दिले ( Residential Schools by Tribal Department) नाही. त्यामुळे संस्था कशी चालवायची असा प्रश्न राज्यातील संस्थाचालकांसमोर उभा ठाकला आहे. आत्तापर्यंत कशाबशा या संस्था सुरू होत्या. मात्र शासन याबाबत कमालीचे उदासीन असल्यामुळे आणि याचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्याने या शाळेतील वसतिगृह बंद ठेवण्याचा पवित्रा संस्थाचालकांनी घेतला आहे. त्यामुळे आदिवासी विभागाच्या उदासीनतेमुळे आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण : जिल्ह्यात अशा सहा अनुदानित शाळा आहेत ज्यामध्ये स्कॉलर सर्च अकादमी कोरपना, गुरुनानक पब्लिक स्कुल बल्लारपूर, देवयानी इंटरनॅशनल स्कुल सिंदेवाही, फेअरी लँड स्कुल भद्रावती, इंदिरा गांधी स्कुल राजुरा आणि ट्विंकल स्कुल नागभीड या शाळांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तो दुर्गम ठिकाणी वसला आहे. अशा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते, त्यांना निवासाची सोय आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. आदिवासी विभागाने त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. याचे अनुदान शासनाकडून शैक्षणिक संस्थेला दिले जाते. मात्र मागील तीन वर्षांत शासनाने निधी देण्यास पाठ फिरवली आहे.
शासनाच्या जीआरनुसार 50 टक्के अनुदानाची रक्कम ही शाळांना मिळायला हवी: कोरोनाची लाट सुरू झाल्यानंतर अनुदान देण्याची प्रक्रिया रखडली. आदिवासी विभागाकडून शाळांची प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर शेरा दिला जातो, त्यानुसार प्रति विद्यार्थी 50, 60 आणि 70 हजार अशाप्रमाणे अनुदान मंजूर केले जाते. 2020-21 या वर्षांत मिळणाऱ्या अनुदानापैकी 85 टक्के रक्कम देण्याचे शासनाने ठरवले मात्र यापैकी केवळ 25 टक्के रक्कमच जमा करण्यात आली, तेही 18 महिन्यानंतर. 2021-22 चे अनुदान आठ महिन्यांनंतर केवळ 25 टक्के देण्यात आले. तर 2022-23 चे एकही टक्का अनुदान अजूनही शाळांना मिळालेले नाही. विशेष म्हणजे शासनाच्या जीआरनुसार जुलै-ऑगस्ट महिन्यातच 50 टक्के अनुदानाची रक्कम ही शाळांना मिळायला हवी. निवासी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना भोजन, कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य आदी पुरवावे लागते.