चंद्रपूर - राजुरा विधानसभा क्षेत्रात सर्रासपणे कोंबड बाजाराचा अवैध व्यवसाय सुरू आहे. येथे जुगार खेळला जातो, लगतच्या तेलंगणा राज्यातील बडे लोक येथे येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या हातात आता कुठे थोडे पैसे आले आहेत. अशावेळी जर शेतकऱ्यांना या नादी लावले जात असेल तर पुढे त्यांनी कशाच्या भरवशावर जगायचे हा प्रश्न उभा राहील. याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्वरित घेऊन कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने या कोंबड बाजारांचा सोक्षमोक्ष लावू, असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिला आहे.
राजुरा क्षेत्रात सध्या कोंबड बाजाराला उधाण आले आहे. राजुरा तालुक्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आर्वी-कापणगाव शेतशिवारात सर्रास कोंबडबाजार सुरू आहे. येथे एकाच दिवशी 70 ते 80 जोड्यांची लढत होते. यावर लाखोंची बाजी लावली जाते. सोबत लाखोंचा जुगार खेळला जातो. दोन लाख रुपये दाखवूनच जुगार खेळण्याची परवानगी आहे. इतके याचे भव्य स्वरूप आहे. यासाठी लगतच्या तेलंगणा राज्यातील जुगार खेळणाऱ्या श्रीमंत लोकांना येथे आणले जाते. रात्रभर हा जुगार खेळला जातो. एका दिवशीची उलाढाल कोटीच्या घरात आहे. येथे फोन पे आणि गुगल पे अद्यावत सुविधा आहे. शाळकरी मुलांचा येथे उपयोग होतो आहे. याचा म्होरक्या गोलू नामक व्यक्ती आहे. तर दुसरा कोंबड बाजार हा कोरपना तालुक्यातील विरुर-गाडेगाव येथे हा जुगार सुरू आहे. याचा म्होरक्या हा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील 'मटका किंग' असल्याची माहिती आहे. येथे देखील हाच प्रकार आहे.
पोलीस प्रशासन आणि राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
तेलंगाणा राज्यातील बडे जुगारी येथे येत आहेत. एकूणच हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर आहे. मात्र, पोलीस प्रशासन यावर कुठलीही कारवाई करण्यास पुढे धजावत नाहीत. यावर शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी खंत व्यक्त केली आहे. कुठलाही अवैध व्यवसाय हा पोलीस प्रशासनाचा आशिर्वाद आणि राजाश्रयाशिवाय चालू शकत नाही, असे म्हणत त्यांनी पोलीस प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.