चंद्रपूर - शत्रूंच्या रणगाड्यांचा धुव्वा उडविण्यासाठी यापूर्वी जे भुसुरुंग लावले जायचे त्यात लोखंड आणि इतर धातूंचा उपयोग केला जायचा. त्यामुळे असा भुसुरुंग शत्रूंकडून सहज ओळखल्या जाऊ शकत होते. भुसुरुंगावर भार पडला की त्याचा स्फोट व्हायचा, मग तो शत्रूचा असो की मित्र पक्षाचा. ह्या स्थितीवर मात करण्यासाठी चांदा आयुध निर्माणीला मोठे यश मिळाले आहे. येथे अत्याधुनिक प्रणालीने सुसज्ज असलेले 'अदृश्य-2' नावाचे भुसुरुंग येथे तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुर्णतः भारतीय बनावटीचे हे भुसुरंग असून यामुळे भारतीय सैन्याच्या दारूगोळ्यात एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. या भुसुरुंगाची पहिली खेप पहिल्यांदाच बाहेर काढण्यात आली. ज्याचे रीतसर उदघाटन आज करण्यात आले.
चांदा आयुध निर्माणीच्या शिरपेचात मानाचा तुरा 2008 पासून प्रयत्नरत -
सैन्यदलाला 500 भुसुरुंगाची पहिली खेप रवाना करण्यासाठी शानदार सोहळा आयोजित करण्यात आला. 2008 पासून DRDO खाजगी कंपन्या आणि चांदा आयुध निर्माणीचे शास्त्रज्ञ यासाठी प्रयत्नरत होते. मात्र मागील वर्षी चीन-भारत सीमेवर झालेला संघर्ष लक्षात घेता अशा अचूक भुसुरुंगाची गरज प्रकर्षाने जाणवली. आयुध निर्माणी कारखान्यांना "सैन्यमागची शक्ती" म्हटले जाते. त्यानुसार सैन्याने व्यक्त केलेली गरज लक्षात घेत 'अदृश्य'ची निर्मिती करण्यात आली आहे. शत्रूचे अजस्त्र वजनी रणगाडे क्षणात उध्वस्त करण्याची क्षमता यात आहे. Influence mine MK2 'अदृश्य' असे अत्याधुनिक भुसुरुंगाचे नाव आहे.
स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक भुसुरुंग -
नव्या भुसुरुंगाची रचना इलेक्ट्रॉनिक सर्किट वर आधारलेली आहे. शक्तिशाली सेन्सर्सद्वारे शत्रूचे लष्करी वाहन अचूकपणे ओळखण्याची यंत्रणा यात विकसित केली गेलीये. संशोधन आणि विकासानंतर सैन्यदल आणि भारतीय सैन्याच्या विविध यंत्रणांनी या भुसुरुंगाची विविध टप्प्यांवर चाचणी केली आहे. पुढील 5 वर्षात सैन्यदलाला 20 हजार 'अदृश्य' भुसुरुंग सुपूर्द करण्याचे आयुध निर्माणी चांदा चे नियोजन आहे. देशासाठी स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक भुसुरुंगाची निर्मिती झाल्याने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.