चंद्रपूर- मनपाच्या बायोमायनिंग प्रकल्पाच्या घोटाळ्याची दखल आता नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली आहे. हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी केली जाईल. जर त्यात तथ्य आढळले तर कुणालाही सोडणार नाही असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे बायोमायनिंग कंत्राटाचे घबाड आता समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
'बायोमायनिंग घोटाळ्यात कोणी दोषी असेल तर कुणालाही सोडणार नाही' - चंद्रपूर बातमी
बायोमायनिंगचे 3 कोटी 31 लाखांचे कंत्राट 2018 ला विश्वेश हायड्रोटेक या नागपूरच्या कंपनीला दिले. यात कचऱ्यापासून खतनिर्मिती तयार करण्याचे काम पूर्ण करायचे होते. बल्लारपूर मार्गावरील कचरा डेपोमध्ये मागील दहा ते बारा वर्षांत जो कचरा जमा झाला. त्यावर रीतसर प्रक्रिया करून त्याला जमिनीत पुरायचे होते.
एवढेच नव्हे तर याच कंपनीला आणखी एक कंत्राट देण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत हा विषय चर्चिला जाण्याची शक्यता होती. मात्र, महापौर राखी कांचर्लावार येण्यापुर्वीच आमसभा आटोपली. यानंतर हा विषय घेऊन विरोधकांनी गदारोळ केला. कुठलाही विषय आमसभेत चर्चेत येण्यासाठी त्याची पूर्वकल्पना द्यावी लागते. मात्र, विरोधकांनी तशी औपचारिकता पार पाडली नाही असे स्पष्टीकरण महापौर कांचर्लावार यांनी दिले. आज राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे चंद्रपूर दौऱ्यावर आले असता त्यांना हा विषय निदर्शनास आणून देण्यात आला. यावर त्यांनी चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. जर दोषी असतील तर या प्रकरणात कुणालाही सोडले जाणार नाही असे आश्वासन दिले. त्यामुळे मंत्रीमहोदय यांच्या म्हणण्यानुसार, खरंच याची चौकशी होते का, यावर नेमकी कुठली कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा-कानपूर चकमक प्रकरण: तीन आरोपी अटकेत