महाराष्ट्र

maharashtra

Tiger Day ला मुख्यमंत्र्यांनी शेअर केले रुबाबदार वाघाचे स्वतः टिपलेले देखणे PHOTOS

By

Published : Jul 29, 2021, 2:04 PM IST

Updated : Jul 29, 2021, 2:23 PM IST

जंगलात गावकऱ्याचा वाढता हस्तक्षेप, गरिबी, रोजगारीचा अभाव जंगलतोड, अतिक्रमण, विकासकामे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वण्यजीव-मानव संघर्षात वाढ होत असून मानवावरील हल्यात आणि मृत्यूत सतत वाढ होत आहे. २००६ पासून सुरु झालेला वाघ मानव संघर्ष वर्षागणिक वाढतच असून त्यामुळे गेल्या सात वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात २६ वाघ आणि १२२ मानवी मृत्यू झालेले आहेत.

International Tiger Day
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर वरुन

चंद्रपूर - राज्यात जितके वाघ आहेत त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक वाघ हे एकट्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत आणि तेवढेच वाघ हे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात आहेत. त्यामुळे वाघांचे संवर्धन करण्यात प्रशासन यशस्वी ठरले मात्र जसजशी वाघांची संख्या वाढली तसा मानव-वन्यजीव संघर्ष देखील वाढला आहे. सध्या वाघांची संख्या ही 248 असून 2021अखेरीस ही संख्या 300 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर गेल्या सात वर्षांत हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 122 जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे वाघ आणि माणूस दोघांनाही वाचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. असे मत जागतिक व्याघ्र दिनानिमित्यांने बोलतांना ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यानी स्वतः काढलेले फोटो केले शेअर -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पहिले प्रेम म्हणुन त्यांच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला ओळखले जाते. आज जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी स्वतः काढलेले वाघाचे मोहकक्षणांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर वरुन घेतलेला सुंदर फोटो

सात वर्षात जिल्ह्यात २६ वाघ आणि १२२ मानवी मृत्यू -

जंगलात गावकऱ्याचा वाढता हस्तक्षेप, गरिबी, रोजगारीचा अभाव जंगलतोड, अतिक्रमण, विकासकामे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वण्यजीव-मानव संघर्षात वाढ होत असून मानवावरील हल्यात आणि मृत्यूत सतत वाढ होत आहे. २००६ पासून सुरु झालेला वाघ मानव संघर्ष वर्षागणिक वाढतच असून त्यामुळे गेल्या सात वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात २६ वाघ आणि १२२ मानवी मृत्यू झालेले आहेत. २००६ मध्ये केवळ ९ संघर्षाच्या घटना घडल्या होत्या त्या वाढून २०१८ मध्ये ९१७ पर्यंत वाढल्या आहेत. ह्यातील सर्वाधिक ५५ % घटना ब्रम्हपुरी, २५ % चंद्रपूर आणि २० % घटना सेन्ट्रल चांदा विभागात घडल्या आहेत. वन्यजीव आणि मानव दोघांचेही प्राण वाचवायचे असेल तर वन विभाग, ग्रामीण नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पुढारी ह्यांनी एकत्र येवूनच ह्या समस्येवर मात करता येईल असे मत ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी जागतिक व्याघ्र दिनानिमित्य व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर वरुन घेतला वाघाचा मोहकक्षणांचा फोटो

ताडोबातील वाघ विविध मार्गे महाराष्ट्रभर जात आहेत यातून मानव-वाघ संघर्ष -

हमखास व्याघ्र दर्शन देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध असून पर्यटक वाघ पाहण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर येतात. उत्तम अधिवास आणि वन्यजीव क्षेत्रात संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या ,विकास, रोजगारीचा अभाव ह्यामुळे ग्रामीण लोकांची जंगलावरील अवलंबित्व वाढली आहे. जवळ-जवळ ८०० गाव जंगलात किंवा परिसरात आहेत. त्यामुळे वाढत्या वाघ-वन्यजीवांचा त्रास शेतकरी आणी नागरिकांना होतो आहे. तशीच समस्या वण्यजीवाची सुधा आहे. जिल्ह्यात वेकोलीच्या खाणी आणि अनेक उद्योग आहेत. त्यामुळे वाघ -वन्यजीवांचे अधिवास, भ्रमण मार्ग बाधित झाले असल्यामुळे वन्यजीव-वाघ-मानव संघर्षात वाढ झाली आहे. केवळ चंद्रपूर शहराजवळ २१ वाघ आहेत, चंद्रपूर प्रादेशिक जंगलात ३० पिलांच्या वाघीन, ३७ बछडे आणि ४१ लहान वयस्कर वाघ आहेत. यावरून वाघांच्या संख्येत किती वाढ झाली हे लक्षात येते. वाघांच्या वाढीमुळेच ताडोबातील वाघ विविध मार्गे महाराष्ट्रभर जात आहे. त्यातूनही त्या ठिकाणी वाघ-मानव संघर्ष उद्भवत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटरवरुन घेतलेला फोटो

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची अधिकृत संख्या -

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दशकात वाघांची संख्या वाढली आहे. ती पुन्हा वाढतच आहे. या वर्षाअखेर ही संख्या ३०० च्या जवळ असेल असे वनविभागाचे मत आहे. ही संख्या सुद्धा वाघ-मानव संघर्ष वाढण्यास कारणीभूत आहे. ताडोबा आणि प्रादेशिक मिळून वाघांची संख्या २०१४ मध्ये १११ होती. २०१५ – १२१, २०१६ -१२८, २०१७ – १५२, २०१८ – १६०, २०१९ - २२१, २०२० - २४६ इतकी प्रचंड वाढली. पूर्वी ताडोबातील वाघांची संख्या प्रादेशिकपेक्षा जास्त असायची. परंतु, २०१७ च्या पुढे ह्यात बदल झाला असून प्रादेशिक जंगलातील वाघांची संख्या ताडोबापेक्षा वाढली. २०१७ मध्ये ताडोबात ७५ वाघ तर प्रादेशिक मध्ये ७७ वाघ होते. २०१९ मध्ये ताडोबात १०६ तर प्रादेशिकमध्ये ११५ वाघ, २०२० मध्ये ताडोबात १०६ वाघ तर प्रादेशिक मध्ये १४० वाघ आढळले. ह्या आकडेवारी वरून संरक्षित जंगलापेक्षा असंरक्षित जंगलात वाघांची संख्या वाढत आहे. जंगलात, शेतात, कोळसा खाणीत, थर्मल पॉवर स्टेशन,औद्योगिक आणि ग्रामीण भागात सुद्धा वाघांनी आपले तात्पुरते अधिवास बनविलेले आहे. वाघ-मानव संघर्षात मानवी मृत्यू वाढत आहेत.

जागतिक व्याघ्र दिन

सात वर्षात वाघांमुळे १२२ मृत्यू -

२०१४ मध्ये ताडोबा, प्रादेशिक आणि इतर जंगलात वाघ आणि इतर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात ९ लोकांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये ८, २०१६ मध्ये १७, २०१७ मध्ये १७, २०१८ मध्ये २७, २०१९ मध्ये २५, २०२० मध्ये ३३ आणि २०२१ मध्ये आतापर्यंत ३१ लोकांचा वन्यजीवांमुळे मृत्यू झाला आहे. २०१४ ते २०२१ दरम्यान १६७ लोक मृत्युमुखी पडले असून ह्यात वाघांमुळे १२२ तर इतर प्राण्यांमुळे ४५ गावकऱ्याचा मृत्यू झाला आहे. व्याघ्र प्रकल्पात ३५ आणि प्रादेशिकमध्ये १३२ लोकांचा मृत्यू झाला होता. हा आलेख पाहता दर वर्षी मानवी मृत्यूत वाढ होताना दिसत आहेत. ह्या वर्षीचे वैशिष्ट म्हणजे उन्हाळ्यात होणारा हा संघर्ष आता जून-जुलै महिन्यात सुधा घडतो आहे. ह्यात मृत्युमुखी पडनाऱ्यात गुराख्यांचा समावेश जास्त आहे.

वाघ-मानव संघर्षात वाघांचा मृत्यू-

२०१४ ते २०२१ ह्या सात वर्षात नैसर्गिक, अपघात आणि शिकार अश्या घटनात एकूण ६४ वाघांचा मृत्यू झाला असून नैसर्गिक कारणामुळे ३८ वाघ, अपघातात ११ वाघ, आणि शिकारीत १५ वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. या घटना पाहता २०१९ आणि २०२० ह्या दोन वर्षात शिकारीमुळे १० वाघांचा मृत्यू झाला ही घटना ह्या संघर्षाचे वाढते स्वरूप विषद करते. हा संघर्ष कमी करण्यासाठी २६ जुलै रोजी नागपूर येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव यांनी जिल्ह्यातील सर्व वनाधिकारी आणि तज्ञांची वेबिणारद्वारे बैठक घेतली आणि सुचना मागविल्या होत्या.

हा संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना-

  • वाढते वाघ-बिबट-अस्वल आणि वन्यजीवांची संख्या, हल्यात मानवी मृत्यू ,शेतीचे नुकसान, जंगलतोड आणि मानवाचा जंगलातील हस्तक्षेपामुळे वाघ-मानव संघर्ष वाढतो आहे. वाघ, वन्यजीव आणि मानव यांचे अस्तित्व महत्वाचे असुन त्यांच्यात सहजीवन साधता येईल काय ह्यावर चिंतन झाले पाहिजे.
  • यासाठी दीर्घकालीन आणि लघु कालीन उपाय योजना करणे अत्यावश्यक आहे.
  • वन जमिनीवर आणि वाघांच्या भ्रमण मार्गात वनीकरण, गवताळ प्रदेश वाढविणे, जलसाठे तयार करणे, गावाजवळ मोह, फळझाडे आणि तेंदू झाडांची लागवड करणे.
  • गावे आणि शेतीसाठी सोलार कुंपन, गावांची जंगलावरील अवलंबित्व कमी करणे, ग्रामीण भागाचा विकास करणे.
  • जंगलातील रस्त्यांना आतून वन्यजीव मार्ग देणे.
  • वनशेतीला चालना देणे आणि वाघ-मानव संघर्षासाठी स्वतंत्र सेल स्थापण करणे इत्यादी. अनेक स्थायी उपाय योजना आवश्यक आहेत.

लघुकालीन उपाय योजना -

  • जसे हल्ले करणाऱ्या आणि अगदी गावाजवळ असलेल्या वाघ, बिबट, अस्वल ह्यांना त्वरित पकडण्याची परवानगी मिळणे आणि योग्य अभयारण्यात सोडणे.
  • लोकांना जंगलात जाण्यापासून परावृत्त करणे.
  • जंगलात चराईवर नियंत्रण, वन विभागाचे नियमित निरिक्षण ठेवणे.
  • स्थानिक नेते आणि गावकऱ्यांचे संवर्धनासाठी मन वळविणे.

जिल्हा परिषद आणि वन विभागातर्फे ग्रामीण भागात गरिबी दूर करणे इ. अनेक विकासाच्या विविध योजना राबवविणे अश्या अनेक उपाय योजना राबविल्यास वाघ-मानव संघर्ष निश्चित कमी करता येईल असे प्रा. सुरेश चोपणे यांनी सुचविले आहे.

हेही वाचा - ETV Special Report: मेळघाट ते गुजरात व्याघ्र संचारमार्गाचे भिजत घोंगडे; 9 वर्षांपासून वनविभागात प्रस्ताव धुळखात

Last Updated : Jul 29, 2021, 2:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details