चंद्रपूर- येथील चिमूर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे. चिमूर पंचायत समिती कार्यालयसमोर तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांचे पुतळे आहेत. मात्र, येथील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. पुतळ्यावर धूळ चढली आहे. तसेच, पुतळ्याच्या भिंतीला तडे गेले आहेत.
राष्ट्रसंताच्या कर्मभुमीतच राष्ट्रसंताकडे दुर्लक्ष हेही वाचा-जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर.. पाहा, कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ?
चिमूर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे. 'पत्थर सारे बम बनेंगे भक्त बनेगी सेना' या क्रांती गिताने चिमूरची तरुणाईने १६ आॅगस्ट १९५६ ला इंग्रजांच्या राजसत्तेविरुद्ध पेटून अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. देशात सर्व प्रथम तीन दिवस चिमूरने स्वांतत्र उपभोगले होते. तुकडोजी महाराजांनी किशोरावस्थेत साधना भूमी गोंदेळा येथे वास्तव्य केले. संपूर्ण चिमूर तालुक्यामध्ये त्यांचा संचार होता. त्यांची अनेक भजने या परिसरात निर्माण झाली आहेत. चिमूर ही राष्ट्रसंताची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वांगीण ग्रामविकास आणि ग्रामस्वच्छता यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांचे पुतळे शेकडो ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर कोरण्यात आले आहेत. तसेच या दोन्ही संतांच्या नावाने स्वच्छतेचे पुरस्कार वाटण्यात येतात.
ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध कल्याणकारी तथा विकासात्मक योजना राबविण्याचे काम पंचायत समितीमधून केले जाते. पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच नागरिक आपल्या विविध कामासाठी येत असतात. त्यामळे चिमूर पंचायत समितीच्या जुन्या इमारती शेजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. प्रशासनाने फक्त वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी केली. मात्र, या महापुरुषांचे विचार आणि महान कार्यायास अनुसरून पुतळ्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे दोन्ही पुतळ्यावर व या खोलीत धुळीचे साम्राज्य आहे. तसेच येथे अडगळीचे साहित्य ठेवल्याने स्टोअर रुमचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या झोपलेल्या प्रशासनास कधी जाग येईल, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.