महाराष्ट्र

maharashtra

Human Wildlife Conflict : ब्रम्हपुरी क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला; दोन वाघांमुळे 28 गावांत हायअलर्ट; एक जेरबंद

By

Published : Jul 18, 2023, 6:56 PM IST

ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष ही मोठी समस्या आहे. हा संघर्ष शिगेला पोचला आहे. या भागात दोन वाघांनी दहशत माजवली आहे. त्यामुळे तब्बल 28 गावांत हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. सिंदेवाही येथे एका वाघाला पकडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस असताना ही मोहीम सुरु होती. (Human Wildlife Conflict)

Human Wildlife Conflict
ब्रम्हपुरी क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष

चंद्रपूर :ब्रम्हपुरी वनविभाग हा झुडुपी जंगलासाठी ओळखला जातो. काही जंगल, काही शेत, काही नागरी वसती असा येथील भौगोलिक परिसर आहे. त्यामुळे येथे मानव वन्यजीव संघर्ष ही एक मोठी समस्या आहे. सध्या येथे दोन वाघांची दहशत आहे. वाघांनी अनेक ग्रामस्थ शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे 28 गावांत हायअलर्ट घोषित करण्यात आला असून तेथे सतर्कता बाळगण्यात येत आहे. दरम्यान सिंदेवाही येथे एका वाघाला पकडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस असताना ही मोहीम सुरु होती. या वाघाला गोरेगाव प्राणी संग्रहालयात स्थानांतरित करण्यात येणार आहे.

28 गावांमधे रेड अलर्ट : काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या तळोधी वनपरिक्षेत्रामधील सावरगांव व उश्राळारिठयेथे वाघाने काही व्यक्तींना आपली शिकार बनवले होते. याच दरम्यान चिमुर वनपरिक्षेत्रामधील डोमा या गावातील वनालगत असलेल्या शेतामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर सिंदेवाही मध्ये देखील एका वाघाने अनेकांवर हल्ले चढवत त्यांचे बळी घेतले. या घटनांमुळे उत्तर ब्रम्हपुरी, दक्षिण ब्रम्हपुरी, तळोधी, चिमुर, नागभिड व सिंदेवाही या वनपरिक्षेत्रांतील 28 गावांना वन विभागाने रेड अलर्ट घोषित केले आहे.

युद्ध पातळीवर कारवाई : सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने लोकांना बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. अशावेळी काही जीवितहानी होऊ नये म्हणून वनविभागाने त्वरित याची दखल घेतली आहे. परिसरातील मनुष्यहानीच्या घटनेस कारणीभुत असणा-या वाघांची ओळख पटवून त्यांना तातडीने जेरबंद करणेबाबत वनविभागाकडून युद्ध पातळीवर कारवाई सुरू करण्यात आली. तसेच परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रात वावर असणा-या वाघांची त्वरीत ओळख करणे शक्य होईल.

पावसातही मोहीम सुरु : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निष्णात असलेली चमु शार्प शूटर व पशुवैद्यकिय अधिकारी यांना वाघांना त्वरीत बेशुध्द करून जेरबंद करण्याकरिता तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू असताना देखील ही मोहीम सुरु आहे. याच दरम्यान सिंदेवाही येथील वाघाला पकडण्यात चमुला यश आले. तर तळोधी येथील दुसऱ्या वाघाला देखील पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. वाघ पकडला गेल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या वाघाला थेट गोरेगाव येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.

जोखमीच्या मोहिमेला अखेर यश : आम्ही वाघावर लक्ष ठेऊन होतो. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असतानाही मोहीम थांबवली नाही. ही मोहीम जोखमीची होती मात्र त्याला यश आले. चमूचे अथक परिश्रम याला कारणीभूत आहेत. दुसऱ्या वाघाला देखील आम्ही त्वरित जेरबंद करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मुख्य वनसंरक्षक डॉ. जीतेंद्र रामगावकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

ग्रामस्थांना हाय अलर्ट : परिसरातील 115 गावांमध्ये 112 प्राथमिक बचाव दलाचे 599 सदस्य कार्यान्वीत करण्यात आले आहेत. ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सतर्केचा इशारा देण्यात आलेला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तातडीच्या मदतीसह शासन धोरणानुसार सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. वनालगतच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी तसेच गुराखी यांनी एकटयाने वनक्षेत्रालगतच्या शेत शिवारात जाण्या संदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वनविभागाचे आवाहन : शेतक-यांनी शेतात एकटयाने न जाता समुहाने जावे तसेच वनविभाग कर्मचारी, बचाव दलाची चमू यांना सुचित करावे. गुराख्यांनी दाट वनक्षेत्रात गुरे चराई करिता नेऊ नयेत तसेच वनक्षेत्रात जनावरांसोबत एकटे राहू नये, रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे गावालगत अनावश्यक वाढलेली झाडे झुडुपे साफ करावी, सरपंच ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांनी गावाच्या लगतच्या रस्त्यावर प्रखर विद्युत दिवे लावण्याची व्यवस्था करावी. वन्य प्राण्यांना बघण्यासाठी गर्दी करु नये त्यांना दगड मारून पळवून लावण्याचा प्रयत्न करु नये, त्यांचे मोबाईल द्वारे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करु नये ज्या भागात वाघीण पिल्लांसह दिसत असेल त्या भागात जाणे टाळण्याचेही आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

  1. Chandrapur Lok Sabha : काँग्रेसने केले स्पष्ट; लोकसभेची उमेदवारी धानोरकर कुटूंबालाच
  2. Ammunition Export From India: चांदा आयुध निर्माणीमुळे देशाला मिळणार ८० कोटींचे परकीय चलन, 'हे' उत्पादन केले निर्यात

ABOUT THE AUTHOR

...view details