मुंबई - मोबाईल हा आपल्या लोकांच्या जीवनातील अविभाज्य अंग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोकांकडून मोबाईलचा वापर केला जातो. हा मोबाईल अनेक ठिकाणी डोकेदुखी ठरत असल्याने मोबाईल जॅमर बसवण्यात येतात. नाट्यगृहांमध्येही नाटकाचा प्रयोग सुरु असताना मोबाईलच्या रिंग वाजल्याने अनेकवेळा अडथळे येत असतात. त्यामुळे पालिकेची मालकी असलेल्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवावेत, अशा ठरावाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिका सभागृहात मांडली आहे.
नाटक सुरू असताना प्रेक्षकांच्या मोबाइलची रिंग वाजत असल्याने स्टेजवरील कलावंतांची एकाग्रता भंग पावते. तसेच हे प्रकार सातत्याने घडत असल्याने कलावंतांना खूप त्रास होत असल्याची तक्रार अभिनेते सुमित राघवन यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी ही सूचना केली आहे. मोबाईल रिंग वाजत असल्याने अनेकवेळा कलाकारांना नाटक थांबवून प्रेक्षकांना आवाहन करावे लागते. मात्र तरीही अनेक प्रेक्षकांच्या मोबाइलची रिंग वाजणे बंद होत नसल्याने आता जॅमर बसवणे हा त्यावरचा पर्याय असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.