मुंबई - भाजप कार्यकारिणीचा मेळावा आज मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. निवडणुकीपूर्वी जे जे वायदे आम्ही केले त्यांची आम्हाला आठवण आहे. आम्ही अच्छे दिन येतील असे जनतेला सांगितले होते. त्याची आता सुरुवात झाली आहे. देश बदल रहा है, असे आम्ही सांगत होतो. आता खरोखरच देश बदलत असून या देशात एच्छे दिन आले आहेत.असे भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी म्हटले आहे.
भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे
जगभरात आपल्या देशाची आणि आपली प्रतिमा केवळ भ्रष्टाचारी अशी होती. आता ती पुसली गेल्याने विदेशात राहणाऱ्यांना आपल्या भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे. अमेरिकेत सुद्धा या बदलाचा प्रभाव दिसतोय. त्यामुळे देश नक्कीच बदलला आहे. जगातील महत्वाचे देश त्यांच्या देशातील सर्वोच्च सन्मान मोदींना देत आहेत. हाच मोठा बदल देशात घडला आहे, असे ते म्हणाले.
भाजपकडे नेता, निती, कार्यकर्ता, कार्यक्रम असे सर्व काही
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धरतीवर काम करण्याची संधी मला पक्षाने दिली आहे. आज राजकीय दृष्टीने पाहिले तर काही पक्षाकडे नेता आहे पण निती नाही, तर काहींकडे नैतिकता, कार्यक्रम, आणि कार्यकर्तेच नाहीत. परंतु भाजप हा एकच पक्ष आहे ज्यांच्याकडे नेता, निती, कार्यकर्ता, कार्यक्रम असे सर्व काही आहे.