महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्रिकर हे खऱ्या अर्थाने "The right man in the wrong party" - डॉ. विनय काटे

पर्रिकर खऱ्या अर्थाने "The right man in the wrong party" होते. भाजपच्या चिखलातील अभावाने दिसणाऱ्या कमळापैकी एक होते. आता तिथे फक्त चिखल उरलाय, असे म्हणायला हरकत नाही, असेही विनय काटे म्हणाले.

By

Published : Mar 18, 2019, 3:09 AM IST

डॉ. विनय काटे

मुंबई- विरोधी विचारधारेच्या पक्षातही काही लोक असे असतात, ज्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर असतो. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल क्वचितच कुणी शंका घेऊ शकते. पंडित नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोमनाथ चॅटर्जी, ज्योती बसू, जॉर्ज फर्नांडिस या महान नेत्यांच्या यादीत पर्रिकरांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल, असे डॉ. विनय काटे म्हणाले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा काँगेस सपाटून हारणार, हे दिसत होते. त्यावेळी मला वैयक्तिक वाटायचे, की भाजप जिंकणारच असेल तर पर्रीकर पंतप्रधान व्हावेत. पण दुर्दैवाने असे घडले नाही. मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाले आणि नंतर जे घडले ते सगळेच भोगत आहेत, असेही काटे म्हणाले.

डॉ. विनय काटे

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी जेव्हा पहिल्यांदा पर्रीकर विराजमान झाले, त्यावेळी खूप कमी लोकांना या माणसाच्या साधेपणाची कल्पना होती. सरकारी कामानिमित्त जेव्हा ते मुंबईत यायचे तेव्हा त्यांच्यासोबत एखादा सहाय्यक अधिकारी सोडला तर कसलाही मोठा लवाजमा नसायचा. ते शांततेत यायचे, आपल्या भेटीगाठी व कामे उरकून शांततेत गोव्याला निघून जायचे. कुणाला सांगूनही पटले नसते, की आयआयटीमधून शिकलेला, उच्चविद्याविभूषित असे पर्रिकर इतके साधे व सरळमार्गी होते. गोव्यातही ते नेहमी स्वतःच्या दुचाकीवरून एखाद्या सामान्य नागरिकासारखे फिरायचे आणि सरकारी आवास सोडून स्वतःच्या साध्या वडिलोपार्जित घरात राहायचे.

मोदी सरकारच्या काळात पर्रिकरांना नाईलाजाने बऱ्याच अशा गोष्टी कराव्या लागल्या, ज्या त्यांनी इतर वेळेस केल्या नसत्या. त्यांनी काही चुकीची वक्तव्ये केली, मात्र, त्यात त्यांचा नाईलाज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अल्पमतात सरकार बनवण्याचा "शाह पॅटर्न" पर्रिकरांनी ऐरवी स्वीकारला नसता, पण ते त्यांच्या शेवटच्या काळात होते. राफेल करारात विरोधी पक्षांनी थेट मोदींवर आरोप केले, परंतु संरक्षणमंत्री राहिलेल्या पर्रिकरांवर कुणीही कसलाही आरोप केला नाही. राजकीय क्षेत्रात एवढं चांगलं नाव आणि प्रामाणिकपणाची इमेज भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयींनंतर क्वचितच कुणाला मिळाली असेल, ती पर्रिकरांना. ते खऱ्या अर्थाने "The right man in the wrong party" होते. भाजपच्या चिखलातील अभावाने दिसणाऱ्या कमळापैकी एक होते. आता तिथे फक्त चिखल उरलाय, असे म्हणायला हरकत नाही, असेही विनय काटे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details