महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्यांनी लाथ मारून काढले, त्यांच्यासोबतच केली आघाडी ; उद्धव ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

मंत्री असताना जमीन विकायला काढणारे शरद पवार तुम्हाला पंतप्रधान म्हणून चालतील का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सभेत उपस्थित केला.

By

Published : Apr 12, 2019, 9:30 PM IST

Updated : Apr 13, 2019, 3:46 AM IST

उद्धव ठाकरे

बुलडाणा - शरद पवारांनी सर्वांच्या पाठीत खंजीर खुपसले. ज्यांनी लाथ मारून पक्षातून काढले, परत त्यांच्यासोबतच त्यांनी आघाडी केली. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. ते महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप जाधव यांच्या खामगाव येथील प्रचारसभेत बोलत होते.

एकीकडे पाकिस्तानवर हल्ला झाला, हे शरद पवार मान्य करत नाहीत. तर दुसरीकडे माझा सल्ला घेऊन हा हल्ला झाला, असे सांगतात. त्यामुळे हल्ला केला की नाही, हे आधी ठरवा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला. मंत्री असताना जमीन विकायला काढणारे शरद पवार तुम्हाला पंतप्रधान म्हणून चालतील का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ठाकरे म्हणाले, माँ जिजाऊ यांची ही भूमी आहे. या भूमीत मर्दच जन्माला येऊ शकतो. याच जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आले.

उद्धव ठाकरे खामगावमधील सभेत बोलताना

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या धमकीला राहुल गांधी घाबरले-

काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काश्मीरमधील कलम ३७० काढणार नसल्याचा उल्लेख आहे. तर आमच्या सेना-भाजप मित्र पक्षाच्या महायुतीच्या जाहीरनाम्यात ते कलम काढणार असल्याचा उल्लेख आहे. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी राहुल गांधींना धमकी दिली आहे. जर काश्मीरमधील कलम ३७० हटविले तर देशात दोन पंतप्रधान राहतील, अशी ती धमकी आहे. त्याला घाबरुन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कलम ३७० न हटविण्याचा उल्लेख केला आहे.

गरीबी हटावचा नारा इंदिरा गांधींनी दिला. त्यांनी पन्नास वर्षे देशात सत्ता उपभोगली. परंतु देशातील गरिबी कमी झाली नाही. उलट देशातील गरिबी वाढवण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. देशाशी गद्दारी करणाऱ्या देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा द्या, यासाठी भाजप-शिवसेना आग्रही राहणार आहे. राज्यात काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही. सर्व जागा महायुती जिंकणार असल्याचे ठाकरे म्हणाले.


भाजपबरोबरील युतीचे समर्थन-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही सत्तेतून बाहेर का पडत नाहीत म्हणून ते टीका करतात. आम्ही बाहेर सत्तेतून बाहेर पडलो की हे सत्तेत जायला तयार आहेत. शेतकरी, जनता व राममंदिरासाठी भाजपसोबत युती केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोड क्षण येण्यासाठी आम्ही युती केल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.


सैनिकांच्या शौर्याचे खच्चीकरण करू नये-
सैनिकांच्या शौर्याचे राजकारण करण्याचा हक्क कुणालाही नाही. मात्र विरोधकांनी सैनिकांच्या शौर्याचे खच्चीकरण करू नये. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेईल, अशी त्यांनी ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मंत्री महादेव जानकर, रणजित पाटील, संजय राठोड, गुलाबराव पाटील उपस्थित होते.

Last Updated : Apr 13, 2019, 3:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details