बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आत्मदहन आंदोलन केले होते. यानंतर तुपकरांसह काही आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करायला सुरूवात केली आहे. मात्र, रविकांत तुपकारांचे अन्न त्याग आंदोलन सुरूच असल्यामुळे तुपकारांची तब्बेत खालावल्याची माहिती समोर आली आहे.
रविकांत तुपकरांचे आत्मदहन आंदोलन : शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम पूर्ण मिळावी तसेच अतिवृष्टीची रक्कम मिळावी यासाठी चार दिवसाअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकरांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदाहन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला होता. यात काही शेतकरी जखमी झाले व रविकांत तुपकर व 25 शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच न्यायाल्यासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन : रविकांत तुपकर यांनी गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले आहे. आजही अकोला कारागृहात त्यांचे अन्न त्याग आंदोलन सुरूच आहे. त्यात तुपकरांची तब्बेत खालावल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, सरकारने या आंदोलनाचा धसका घेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो रुपये जमा होत आहेत. तुपकर जरी कारागृहात असले तरी मात्र शेतकऱ्यांना इकडे आर्थिक लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.