भंडारा - रणरणत्या उन्हापासून सुटका मिळवी म्हणून तुम्ही जर शिवशाही बसने प्रवास करीत असाल तर सावधान. कारण जर शिवशाही बसची वातानुकूलित यंत्रणा काम करीत नसल्यास हीच शिवशाही बस तुमच्यासाठी शिक्षा बनू शकते. असाच अनुभव भंडारा येथील प्रवाशांना आला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ऊन चांगलेच तापले आहे. विदर्भात तर तापमानाचा पारा ४५ पर्यंत गेला आहे. त्यामुळे प्रत्येक जण या उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्याच्या सतत प्रयत्नात असतो. त्यातच बसने प्रवास करणारे बहुतेक प्रवासी हे सध्या वातानुकूलित शिवशाही बसला प्राथमिकता देत आहेत. त्यासाठी अधिकचे पैसेसुद्धा देतात. मात्र, भंडारा येथील प्रवाशांना शिवशाही बसचा जो अनुभव आला तो खूपच वाईट आणि जीवावर बेतणारा होता.
नागपूर आगराची बस (क्रमांक एमएच-०६ बीडब्ल्यू - ०१३९) ही नागपूरवरून भंडारासाठी निघाली. दरम्यान, ती बस स्थानकावर थांबली असता वातानुकूलित सुरू होते. त्यामुळे प्रवासी गाडीत जाऊन बसले. मात्र, गाडी स्थानकावरून निघाल्यावर प्रवाश्यांना गरम वारा लागायला सुरूवात झाली. त्यानंतर तशी तक्रार त्यांनी चालकाला केली. मात्र, चालकाने एसी सुरू असल्याचे सांगत गाडी पुढे नेली. सतत गरम वारा येत असल्याने प्रवाशांनी गाडी परत बस स्थानकावर घेण्याची विनंती केली. मात्र, चालकाने गाडी परत जाणार नाही. तुम्हांला ज्यांना तक्रार करायची असेल त्यांना करा, असे सांगत गाडी भंडाराच्या दिशेने आणली.