महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 20, 2019, 1:14 PM IST

Updated : Nov 20, 2019, 2:27 PM IST

ETV Bharat / state

जनतेचे किती पैसे खड्ड्यात घातले भंडारावासियांचा सवाल, अधिकाऱ्यांचे मौन

भंडारा शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला जातो. मात्र, सुविधा दिली जात नाही. खड्डे बुजविण्यासाठी किती खर्च झाला? याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले.

रस्त्यात पडलेले खड्डे

भंडारा- जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी चालकांना वाहतुकीसाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. खड्ड्यांमुळे बरेच अपघात होऊन लोकांचे जीव गेले आहेत. दरवर्षी या खड्ड्यांवर करोडो रुपये खर्च होतात. तरीही हे खड्डे खड्ड्यात राहतात. सन 2017-2018 आणि 2018-2019 या कालावधीत जिल्ह्यात खड्ड्यांसाठी किती पैसे खर्च केले? याविषयीची माहिती घेण्यासाठी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी गेले असता भंडारा जिल्हा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता नंदनवार हे काहीही सांगायला तयार नाहीत. तर त्यांचे कर्मचारी पहिले अर्ज करा नंतर माहिती देतो, अशी उत्तरे देत आहेत. त्यामुळे त्या खड्ड्यात नेमके काय दडलेला आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

जनतेचे किती पैसे खड्ड्यात घातले भंडारावसियांचा सवाल


भंडारा शहरात कुठेही तुम्ही रस्त्यावर फिरायला निघालात तर तुमचा सामना होतो तो रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांशी. रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. हे दृश्य केवळ शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळतात. काही रस्त्याचे जीवनमान संपल्याने तर काही ठिकाणी ६ महिन्यांपूर्वी बनलेल्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत.

एखादा रस्ता पूर्णपणे नव्याने बनविला तर ५ वर्षांसाठी त्याच्या देखरेखीची जवाबदारी ही कंत्राटदाराकडे असते. रस्त्यावर एक कारपेट लेव्हल टाकली गेली तर वर्षभर कंत्राटदाराला त्याची देखभाल करावी लागते. जर खड्डे बुजवले तर ६ महिने त्या कंत्राटदाराला ती जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, हे नियम सर्व कागदोपत्रीच बनल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. कारण, प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पाटबंधारे विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार थांबत नसल्याने कंत्राटदारांना कमिशन, टक्केवारीसाठी पैसे द्यावे लागतात. त्यामुळे शिल्लक पैशात आम्ही हे काम करतो, असे एका कंत्राटदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. आता जेथे अधिकारीच भ्रष्टाचारात गुंतलेले असतील तेथे काम तरी कसे होणार.

खड्ड्यांचे प्रमाण अतिशय वाढल्यामुळे पुन्हा हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, खड्डे बुजवल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात तेथे पुन्हा खड्डा दिसतो. काही ठिकाणी खड्डे बुजवण्याच्या नावाखाली अतिशय चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविल्यामुळे वाहने चालवताना सतत वर खाली होतात. त्यामुळे वाहने चालवणे अतिशय धोकादायक आणि कठीण होते.

हेही वाचा - गोसे धरणाची 245 मीटरची पाणीपातळी गाठणे यावर्षीही अशक्यच


सन 2017-18 आणि 18-19 मध्ये रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासाठी किती पैसे खर्च केले याविषयी माहिती विचारण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्याकडे गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. भेटण्यास असमर्थता दाखवली तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता अशी माहिती हवी असल्यास अर्ज करा, अशी उत्तरे दिली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा किती पैसा खड्ड्यात टाकला? याविषयीची माहिती मिळाली नाही. या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधून काढून हे थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

हेही वाचा - केवळ चार महिन्यातच रस्ताचे तीन तेरा, मोहाडी खमारी रस्त्याची दुरवस्था

Last Updated : Nov 20, 2019, 2:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details