भंडारा- कीटकनाशकांवर शासन घालत असलेली बंदी ही योग्य आहे. मात्र यासाठी असलेल्या पर्यायी जैविक औषधांची माहितीही शेतकऱ्यांना देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या कीटकनाशकांवर बंदी केल्यामुळे तांदूळ उत्पादनावर त्याचा प्रभाव होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उलट जैविक कीटकनाशकांचा उपयोग केल्यास कमी खर्चाचा आणि मानवी जीवनासाठी फायद्याचे ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
जे कीटकनाशक मानवी जीवनासाठी हानिकारक आहेत, अशा बऱ्याच कीटकनाशकांवर जगामध्ये बंदी घातली गेली आहे. मात्र अशी कीटकनाशके आजही भारतात विकल्या जात आहेत. कीटकनाशकाचे केवळ वर्तमानातील लोकांवरच नाही तर येणाऱ्या पिढीवरही दुष्परिणाम होतात आणि त्यामुळेच हे घातक कीटकनाशके बंद करणे देशाच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल. आता वापरले जाणारे बहुतांश कीटकनाशके हे विदेशातून आयात केले जातात. त्यामुळे त्यावर बंदी आणण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. तसेच भारतातील रिसर्च सेंटर हवे तसे अत्याधुनिक झाले नाहीत. शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशकांची माहिती पोहोचविण्यात शासकीय यंत्रणाही कमी पडत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात धोकादायक असलेले कीटकनाशके वापरतात असे परखड मत कीटकनाशक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कीटकनाशके वापरल्यामुळे त्याचे अंश तांदूळामध्ये सुद्धा जातात. तसेच जमिनीच्या खाली पाण्यामध्ये सुद्धा त्याचे अंश जातात. हे पाणी आणि तांदूळ पोटात गेल्यावर त्याचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने निर्णय घेतलेल्या कीटकनाशकांवर तात्काळ बंदी घालावी असे मत कीटकनाशक तज्ज्ञ सुधाकर धकाते यांनी व्यक्त केले आहे.