भंडारा- भाजप-सेनेला राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष वाटत होता. या पक्षातील नेते भ्रष्टाचारी आहेत, असेही आरोप त्यांनी केले आहेत. आता त्याच पक्षातील लोकांना स्वतःच्या पक्षात फुल-हार देऊन पतितपावन केले जाते का? भाजप-सेना म्हणजे पतित पावन करणारे तीर्थक्षेत्र झाले आहे का? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला. गेल्या १३ जुलैपासून त्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज भंडाऱयात आल्या असता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाबाबत त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादीत असताना लोक भ्रष्टाचारी असतात. भाजप-सेनेत गेल्यानंतर ते पूर्णपणे शुद्ध होतात, असा गैरसमज भाजप आणि सेना पसरवत आहे. भाजप-सेनेमध्ये सक्षम नेतृत्व नसल्याने राष्ट्रवादीच्या सक्षम नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच या दोन्ही पक्षात कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भविष्यात केवळ सतरंजी उचलण्याचे काम करावे लागणार असल्याची खोचक टीका सलगर यांनी केली.
राज्यात महिला असुरक्षित; रक्षाबंधानाला मुख्यमंत्र्यांना पाठवणार साडीचोळी अन् बांगड्या -