पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे माहिती देतांना भंडारा : सध्या देशात केरला स्टोरी चित्रपट गाजत आहे. यामध्ये केरळमधून ज्या महिला बेपत्ता झाल्या त्यावर आधारित हा चित्रपट आहे. त्याच प्रमाणे भंडारा जिल्ह्यातील महिला बेपत्ता होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यात 2010 ते 2023 या कालावधीत बेपत्ता झालेल्या 14 अल्पवयीन मुलींचा अजूनही शोध लागलेला नाही.
अखेर या मुली गेल्या कुठे? : या बेपत्ता मुली, महिलांचा शोध घेण्याची प्रक्रिया हे सातत्यपूर्ण सुरू आहे. मात्र, तरीही तेरा वर्षाच्या कालावधी बेपत्ता झालेल्या महिलांचे नेमके झाले तरी काय? असा प्रश्न पडतो आहे. या बेपत्ता झालेल्या महिलांची हत्या झाली की, त्यांना मानवी तस्करीमध्ये विकण्यात आले किंवा त्यांचे धर्म परिवर्तन करण्यात आले असा सवाल उपस्थित होते आहे. किंवा बेपत्ता मुलींना, महिलांना देह विक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आले का हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
131 मुली/विवाहीत स्त्रिया बेपत्ता :सद्या मुलीची तस्करी करणारे रॅकेट देशभर सक्रिय आहेत. दररोज शेकडो मुली बेपत्ता होत असल्याची तक्रार पोलिसात करण्यात येते. यात भंडारा जिल्हासुध्दा मागे नाही. जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 2010 पासुन आज पर्यंत अनेक मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील काही मुलींचा पोलिसांनी शोध लावला. पण, अजून 14 अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत. त्यांचा थांगपत्ता सुध्दा लागलेला नाही. फक्त अल्पवयीन मुलीच नाही तर, 2010 ते 2023 या तेरा वर्षात 18 वर्ष झालेल्या मुली, विवाहित महिला एकूण 4 हजार 784 महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या होत्या. या पैकी 4 हजार 653 महिलांना शोधून पोलिसांनी कुटुंबाच्या स्वाधीन केले. मात्र, अजूनही 131 मुली/विवाहीत स्त्रिया बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अल्पवयीन मुली बेपत्ता होण्यामागे प्रेमप्रकरण हे सर्वात सामान्य कारण आहे. तेरा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या 14 अल्पवयीन मुलींचा शोध अजूनही सुरू आहे. ही निरंतर प्रक्रिया असून 131 महिलांचे शोध घेतल्या जात आहे. मात्र, त्याच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही - पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे
पालकांमध्ये भितीचे वातावरण :भंडारा जिल्ह्यात मुली बेपत्ता होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुली शाळेत किंवा शिकवणी वर्गात गेल्यानंतर मुलगी घरी परत येईपर्यंत पालकांमध्ये भितीचे वातावरण असते. पोलिसांनी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अद्यापही शोध लागला नाही. त्यामूळे भंडारा जिल्ह्यात महीला तस्करीचा रॅकेट तर सक्रिय नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर आता या मुलीचे शोध पोलिस कधी लावतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. अल्पवयीन मुली हरवल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कलम ३६३ अन्वये गुन्हे नोंदवले जातात.आतापर्यंत अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्या प्रकरणांमध्ये शारीरिक संबंध आढळून आले, तेथे कलम 376 आणि पॉस्को अंतर्गत प्रकरणे नोंदवली गेली. या महिलांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस हे आव्हान पेलू शकतील का? या मुली आणि महिलांचा माग काढू शकतील का हा खरा प्रश्न आहे.
- Sanjay Raut On JP Nadda : नड्डा जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो; संजय राऊतांची टीका
- NCP core committee : पक्षातच फिरणार भाकरी; आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रावादीचं प्लॅनिंग
- Passenger Smoking In Flight : विमानात धूम्रपान केल्याप्रकरणी प्रवाशावर गुन्हा दाखल