भंडारा :शासकीय नियमानुसार बंधनकारक असलेल्या विविध नियमांना बगल देणाऱ्या सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत रासायनिक खताचे 10 परवाने, बियाण्यांचे 4 परवाने आणि कीटकनाशकाचे 3 परवाने निलंबित करण्यात आले आहे. मागील दोन महिन्याच्या कालावधीत भरारी पथकाने 30 कृषी सेवा केंद्रावर निलंबनाची कारवाई केली आहे.
शेतीचा हंगाम सुरू झाल्यामुळे बियाणे औषधे आणि खताची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला मिळाल्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकाद्वारे कारवाईची मोहीम सुरू केली. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करून योग्य दरात विक्री करण्याचे आदेश कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आले होते. मात्र, तरीदेखील अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर दर्शनी भागात कृषी निविष्ठांचा दर फलक लावलेला दिसला नाही. तसेच नोंदणी प्रमाणपत्र ठळकपणे लावलेले दिसले नाही. तर, पीओएस मशीनद्वारे खताची विक्री न करणे, रासायनिक खताची विक्री करतांना शेतकऱ्यांना एम फॉर्ममध्ये बिल न देणे. विक्री केलेल्या रासायनिक खतांची बिले न ठेवणे, साठा रजिस्टर व गोडाऊनमधील प्रत्यक्षात उपलब्ध असलेला साठा व पोस्ट मशीन मधील साठा यामध्ये तफावत असणे. बिल बुकवर कंपनीचे नाव व लॉट नंबर लिहिलेले नसणे या कारणांवरून ही कार्यवाही करण्यात आली आहे.