महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 13, 2020, 8:11 AM IST

ETV Bharat / state

धक्कादायक ! पतीचा अंत्यविधी होताच पत्नीचीही गळफास घेऊन आत्महत्या

रणजितने आत्महत्या का केली ? याचे कारण अस्पष्ट असताना व सर्व नातेवाईक दुःखात असतानाच गुरुवारी सकाळी मिनाक्षी हिने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

चकलंबा गेवराई तालुका बीड
पती पत्नी आत्महत्या

बीड - पतीचा अंत्यविधी होताच पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील चकलंबा येथे घडली आहे. पतीच्या विरहात पत्नीने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्महत्या केलेल्या पत्नीच्या पतीने देखील बुधवारी औरंगाबाद येथे आत्महत्या केली होती. दरम्यान एक वर्षापूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्यांनी आत्महत्या केल्याने मोठी शोककळा पसरली आहे.

हेही वाचा...रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या विरोधात सासूची पोलिसांत तक्रार

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव (२२) व मिनाक्षी जाधव (२०) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. रणजित जाधव हा औरंगाबाद येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याने तो विवाहानंतर पत्नी मिनाक्षीसह औरंगाबाद येथे राहत होते. दरम्यान बुधवारी रणजित जाधव याने औरंगाबाद याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर शवविच्छेदन करुन रणजित जाधव याचे पार्थिव बुधवारी रात्री उशिरा चकलांबा या गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

रणजित याने आत्महत्या का केली ? याचे कारण अस्पष्ट असताना व नातेवाईक दुःखात असतानाच गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास घरालगत असलेल्या शौचालयात मिनाक्षी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती होताच चकलांबासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. तर घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यानंतर चकलांबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मिनाक्षी च्या पार्थिवावर मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा...गाण्यातून जाणून घ्या काय आहे कोरोना?, वर्ध्यात वैदकीय जनजागृती मंचाचा उपक्रम

एक वर्षांपूर्वी झाला होता विवाह...

एक वर्षापूर्वीच रणजित व मिनाक्षी यांचा विवाह झाला होता. दरम्यान रणजित याने आत्महत्या करुन मिनाक्षीची साथ सोडली. यामुळे पती रणजित याच्या विरहातच पत्नी मिनाक्षीने देखील आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मिनाक्षीच्या आत्महत्येनंतर चकलांबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details