महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जबाजारीपणामुळे नवऱ्याने केली आत्महत्या; बायकोला हाकावा लागतोय कुटुंबाचा गाडा

दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या संकटाबरोबरच सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कर्जबाजारी झाल्याने आलेल्या नैराश्यातून बळीराजा आपलं जीवन संपवतो. मात्र, कुटुंब प्रमुख असलेला शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या कुटुंबाची होत असलेली फरफट यातना देणारी असते.

By

Published : Feb 13, 2021, 4:27 PM IST

Updated : Feb 13, 2021, 5:10 PM IST

कर्जबाजारीपणामुळे नवऱ्याने केली आत्महत्या
कर्जबाजारीपणामुळे नवऱ्याने केली आत्महत्या

बीड- मागील दोन दशकांपासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाही. २०२० मध्ये १७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या २ महिन्यात २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या संकटाबरोबरच सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कर्जबाजारी झाल्याने आलेल्या नैराश्यातून बळीराजा आपलं जीवन संपवतो. मात्र, कुटुंब प्रमुख असलेला शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या कुटुंबाची होत असलेली फरफट यातना देणारी असते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याचाच आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'ने.

कर्जबाजारीपणामुळे नवऱ्याने केली आत्महत्या; बायकोला हाकावा लागतोय कुटुंबाचा गाडा
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या ढाकेफळ येथील रहिवासी हरिदास केरबा थोरात या ४० वर्षीय शेतकऱ्याने २००९ मध्ये कर्जबाजारी व जमीन नापिकीतून आलेल्या नैराश्यामुळे गळफास घेऊन आपले जीवन संपवले. हरिदास यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व पत्नी अनिता असा परिवार आहे. हरिदास यांच्याकडे सहा- सात एकर जमीन होती. २००९ साली हरिदास यांनी आपल्या शेतात कापसाचे पीक घेतले. कापसाची लागवड फवारणी यात मोठा खर्च झाला. मात्र पीक हातचे गेले. या पिकासाठी खाजगी सावकाराकडून आणलेले पैसे द्यायचे कसे? या विवंचनेत हरिदास यांनी आपले जीवन संपवले असल्याचे त्यांच्या पत्नी अनिता सांगतात. सावकाराचे तीन लाख आम्ही फेडले-

माझ्या पतीने आत्महत्या करण्यापूर्वी शेतीच्या मशागतीसाठी सावकाराचे पैसे घेतले होते. त्याचे व्याजासह तीन लाख रुपये झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर मी मजुरी करून तेरा वर्षात खाजगी सावकाराचे तीन लाख रुपये फेडले. यासाठी मला रात्रंदिवस राब-राब राबावे लागले असल्याचे अनिता म्हणाल्या. हरिदास यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची कशी फरफट झाली, याबाबत सांगताना अनिता म्हणाल्या की, माझ्या पतीने आत्महत्या केली तेव्हा माझा मुलगा ८ आणि मुलगी १० वर्षाची होती. त्यांचा सांभाळ करण्याचे, त्यांना शिक्षण देण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर होते. एक वेळेला खाण्याचीदेखील आमची पंचाईत होती. पाच ते सहा एकर शेतीत काय करायचे?, काय पिकवायचं आणि काय खायचे? हा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यातच सतत पडणारा दुष्काळ यामुळे आम्ही हवालदिल झालो. आता या दोन मुलांना घेऊन जगायचं कसं? हा प्रश्न माझ्यासमोर होता.

मदत मागूनही मिळत नव्हती मदत-

माझ्या पतीच्या निधनानंतर शेती करत असताना पाळी पेरणीसाठी मदत मागून देखील कोणी मदत करायला लवकर तयार होत नव्हते. अगोदरच शेतीतून उत्पन्न मिळणे अवघड झाले होते. त्यातही वेळेवर पाळी-पेरणी झाली नाही तर शेती पिकणार कशी? हे सगळं सुरू असताना मुलगा बारावी शिकला पुढे त्याला शिकवण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याला शाळा सोडावी लागली व एका दुकानावर तो कामाला लागला. त्याला मिळणाऱ्या पैशातून पुढे आमचं घर चालू लागलं, आता मुलगी पदवीचे शिक्षण घेत आहे. तिच्या लग्नासाठी पुन्हा मला जमीन विकावी लागते की, काय अशी परिस्थिती आजही आहे.


नवचेतना संस्थेकडून मिळाला मिळाला मदतीचा हात-

नवचेतना सर्वांगीन विकास संस्थेकडून मात्र, मला मदत झाली. नवचेतना संस्थेच्या प्रतिनिधी कौशल्या थोरात यांच्याकडे मी माझी कैफियत मांडली. त्यांनी मला मदतीचे आश्वासन दिले व त्यानंतर नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या प्रमुख मनीषा घुले यांच्याकडे माझा विषय मांडला. त्यांनी मला बिगर व्याजी १५ हजार रुपये कर्ज संस्थेअंतर्गत दिले. त्या पैशांनी मी एक दुभती गाय घेतली. दुधाच्या व्यवसायातून मला चार पैसे मिळू लागले. त्यानंतर मी ते घेतलेले बिगर व्याजी १५ हजार रुपये फेडले. आता माझे संस्थेकडे चांगले क्रिडेट झाले होते. त्यामुळे मला संस्थेकडून पुन्हा ५० हजार रुपयांची मदत मिळाली. असे करत करत मी दुभती जनावरे वाढवली व त्यातून पैसे मिळवले. आता आमच्या कुटुंबाचे जेमतेम चांगले सुरळीत झाले आहे. आता मुलीचे व मुलाचे लग्न करणार असल्याचे अनिता यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्या नंतर त्या कुटुंबातील महिलेलाच भोगावे लागते दुःख-

नापिकी व नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण बीड जिल्ह्यात सर्वाधिक आहे. ताण- तणाव आल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. मात्र, त्यांच्या आत्महत्येनंतर घरातील महिलेला दुःख भोगावे लागते. तिला एकटीलाच संसाराचा गाडा ओढावा लागतो. हे सगळे सुरू असतानाच ना शासनाची मदत होते ना नातेवाईकांची. या बिकट परिस्थितीत शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील महिला अडकलेल्या आहेत. त्यांना आम्ही काही प्रमाणात आमच्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या तथा नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र संस्थेच्या कौशल्या थोरात यांनी सांगितले.

Last Updated : Feb 13, 2021, 5:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details