बीड-केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेले नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. अनेकवेळा मागणी करूनही केंद्र सरकार हे कायदे रद्द करत नसल्याने, गुरुवारी रात्री बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येन सहभागी झाल्या होत्या. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला स्वाभिमानीचा पाठिंबा, बीडमध्ये जागर आंदोलन
केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेले नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. अनेकवेळा मागणी करूनही केंद्र सरकार हे कायदे रद्द करत नसल्याने, गुरुवारी रात्री बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर आंदोलन करण्यात आले.
दिल्ली येथे सात दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. केवळ दुर्लक्षच नाही तर शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न देखील सरकारकडून केला जात आहे. शेतकरीविरोधी कायद्यामुळे शेतकरी उद्धस्त झाला आहे. वारंवार मागणी करून देखील केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. आता यापुढे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, व शेतकरीविरोधी कायदे रद्द होणार नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकऱ्यांच्या संघटना आंदोलन मागे घेणार नाहीत. अशी भूमिका स्वाभिमानीच्या वतीने घेण्यात आली आहे. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, प्रा. सुशीला मोराळे, मोहन जाधव, सारिका गायकवाड यांची उपस्थिती होती.