महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात पंचायत समिती सदस्य पतीचा मृत्यू; आष्टी तालुक्यातील सुरडी येथील घटना

आष्टी तालुक्यातील या घटनेमुळे सुरडी परिसरातील शेतकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सध्या शेतात पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. दिवसभर वीज नसल्याने शेतकर्‍यांना रात्रीच्यावेळी पाणी देण्याशिवाय पर्याय उरत नाही.

By

Published : Nov 24, 2020, 8:54 PM IST

बीड
बीड

बीड- आष्टी तालुक्यातील सुरडी येथील पंचायत समिती गणाच्या सदस्य आशाबाई गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी अचानक बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरण विभागाकडून रात्रीच्यावेळी विद्युत पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी रात्री शेतावर जावे लागते. याचा परिणाम अनेक दुर्घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत.

आष्टी तालुक्यातील या घटनेमुळे सुरडी परिसरातील शेतकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सध्या शेतात पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. दिवसभर वीज नसल्याने शेतकर्‍यांना रात्रीच्यावेळी पाणी देण्याशिवाय पर्याय उरत नाही. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वीज आल्याने नागनाथ गर्जे हे सुरुडीच्या पूर्वेला असणार्‍या दरा नावाच्या शिवारात आपल्या शेतातील पिकास पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास नागनाथ गर्जे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आष्टी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. यापूर्वी आष्टी तालुक्यात अनेक वेळा बिबट्या आढळून आला आहे. एवढेच नाही तर गत महिन्यांमध्ये बीड-नगर जिल्ह्याच्या सीमेवरती एक बिबट्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा लावून पकडला होता. त्यानंतर आता पुन्हा आष्टी तालुक्यातील सावरगाव, आंबोरा बीड-सांगवी, टाकळी या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. महावितरणची वीज रात्रीची असल्याने शेतकर्‍यात प्रचंड भीती आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details