बीड -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्यांच्या कापसाची नोंद करण्याच्या कामात चुकीच्या पद्धतीने नोंदी होत असल्याच्या तक्रारी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत बुधवारी स्वतः बीडचे आमदार क्षीरसागर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन तक्रारींची शहानिशा करत, ज्या शेतकऱ्यांच्या कापसाच्या नोंदीत झाल्या नव्हत्या त्यांच्या नोंदी करून घेण्याचे आदेश दिले. याशिवाय मोजक्या लोकांच्या होत असलेल्या नोंदींचे बिंगदेखील फोडले.
बीड बाजार समितीच्या बाहेर उभे असलेली सर्व वाहनातील कापूस खरेदी केला जाणार आहे. तसेच जिनिंग चालकांनी किरकोळ कारणावरून नाकारलेला कापूस देखील खरेदी केला जाणार आहे. नोंद नसलेल्या कापसाची नोंद रात्री उशिरा पर्यंत घेतली जाईल, अशी ग्वाही बाजार समितीच्या सचिवांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. या प्रसंगी डीडीआर बडे, सांगुळे, बाजार समितीचे सचिव शिनगारे उपस्थित होते.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकर्यांना कापूस विक्रीसाठी टोकन देवून कापूस खरेदी केंद्रावर पाठवले जाते. 6 हजार पेक्षा अधिक शेतकर्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र, बाजार समितीकडून शेतकर्यांवर अन्याय करत या नोंदीमध्येच घोळ असल्याची बाब समोर आली आहे.
शेतकर्यांच्या नोंदी मागे ठेवत व्यापार्यांचीच चलती बाजार समितीत सुरू असल्याबाबत अनेक तक्रारी क्षीरसागर यांच्याकडे आल्या होत्या. यावरून बीड बाजार समितीचे डीडीआर बडे यांना सोबत घेत थेट बाजार समिती गाठली. तेथील शेतकर्यांचे म्हणणे ऐकूण घेत बाजार समितीचे सचिव व कर्मचारी यांना शेतकर्यांच्या समोर उभे केले.
यावेळी नोंदीमध्ये घोळ झाला असून नियमा प्रमाणे कापूस खरेदीची वाहने खरेदी केंद्रावर गेली नसल्याची कबुली यावेळी या अधिकार्यांनी दिली. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नी क्षीरसागर अधिकच आक्रमक झाले. हा गैरप्रकार लक्षात घेताच आक्रमक भूमिका घेवून कर्मचार्यांची कानउघडणी करत तालुक्यातील प्रत्येक शेतकर्याची रात्री उशिरापर्यंत नोंद करा, बाहेर उभी असलेली वाहने आत घेवून कापूस खरेदी केंद्रामार्फत त्याची खरेदी करा, एकाही शेतकर्यांवर अन्याय झाला तर गाठ माझ्याशी आहे, अशा सक्त सूचना यावेळी त्यांनी बाजार समितीच्या अधिकार्यांना दिल्या.
‘त्या’ नाळवंडीच्या शेतकर्यांचा कापूस जिनिंगने घेतला-
सहा दिवसापासून बाजार समितीच्या आवारात कापसाची वाहने घेवून शेतकरी उभे आहेत. तरी नोंदीचा नंबर येवून देखील बाजार समितीकडून टोकन दिले जात नाही. उशिरा टोकन दिल्यानंतर जिनिंग चालक वजन काटा होवूनही कापुूस घेण्यास तयार नसल्याने नााळवंडी येथील शेतकरी हवालदिल झाले होते. संबंधित जिनिंगवरील ग्रेडर शेतकर्यांच्या व्यथा समजून घ्यायला तयार नव्हते. आमदार संदिप क्षीरसागर यांनी या प्रश्नी लक्ष घालते त्यावेळी जिनिंगवरील ग्रेडरला बोलवून घेतले, कापूस नाकारण्याचे कारण विचारताच त्या शेतकर्यांचा घेत असल्याची कबुली ग्रेडरने दिली. 8 दिवसापासून ताटकळत असलेल्या शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान दिसले.