आष्टी (बीड) - पोलीस कर्मचारी हाय..हाय..मुजोर पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा घेत तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आष्टी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन आष्टी तहसीलदार राजाभाऊ कदम यांना दिले. जो पर्यंत त्या मुजोर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही, तो पर्यंत काम बंद अंदोलन करणार असल्याचा इशार निवेदनाव्दारे देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, 5 मे रोजी सांयकाळी आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे हे आपले कर्तव्य बजावून आपल्या गावाकडे सांयकाळी निघाले होते. त्यांना चऱ्हाटा येथे पोलिसांनी अडविले व कुठून आला, कुठे चालला असे अर्वाच्य भाषेत विचारले. डाॅक्टरने आपल्याकडील असलेले ओळखपत्र दाखविले व मी आत्ताच ड्युटी करून आलो आहे, आता घरी चाललो आहे, असे सांगत असतानाच एका पोलीस कर्मचाऱ्याने कसलाच विचार न करता डॉक्टरच्या पाठीमागून काठी मारली व तीन चार पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना मारले. याबाबत डाॅ. विशाल वनवे यांनी तक्रार केली असून, आष्टी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी या मारहाणीचा निषेध केला असून, जो पर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही, तो पर्यंत आपण कामबंद अंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर डाॅ. प्रसाद वाघ, डाॅ. दत्ता जोगदंड, डाॅ. दिपक शेळके, डाॅ. सचिन पाळवदे, डाॅ. नितीन राऊत, डाॅ. नारायण वायभसे या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, जो पर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही, तो पर्यंत तालुक्यात कोठेच लसीकरणही होणार नसल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.