महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 19, 2022, 10:19 AM IST

ETV Bharat / state

Beed ACB : आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचीच होणार चौकशी; मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश

मागच्या काही वर्षात बीड जिल्ह्यात एसीबीने कारवाई न करण्यासाठी 'वसुली' केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते बक्षु अमीर शेख यांना टपालाने यासंदर्भात एक माहिती मिळाली. त्यानुसार जिल्ह्यात एसीबीकडून महिन्याला २४ लाखाची वसुली करण्यात येत असून यात तत्कालीन उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे आणि सध्याचे पोलीस निरीक्षक म्हणून एसीबीतच कार्यरत असलेले रवींद्र परदेशी यांच्यावर या वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत.

Beed ACB
Beed ACB

बीड - बीड जिल्ह्यात यापूर्वी वाळू तस्करीसाठीच्या रेट कार्डने खळबळ माजविली होती. त्यापाठोपाठ आता चक्क एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतच 'वसुली' होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. थेट एसीबीचेच रेट कार्ड सामाजिक कार्यकर्ते बक्षु अमीर शेख यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या तक्रारीत एसीबीच्या मार्फत महिन्याला २४ लाखाची वसुली होत असल्याचा दावा करण्यात आला. त्यात एसीबीच्या यापूर्वीच्या उपअधीक्षकांसह विद्यमान पोलीस निरीक्षकांवर आरोप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात लाचखोरी आणि टक्केवारीची चर्चा नेहमीच होत असते. यापूर्वी जिल्ह्यात वाळू तस्करीसाठी कोणाला किती लाच द्यावी, याचे एक रेटकार्डच वाळू वाहतूकदारांनी जाहीर केले होते. त्यामुळे राज्यात खळबळ माजली होती. आता यापुढचे टोक समोर येत आहे. मागच्या काही वर्षात बीड जिल्ह्यात एसीबीने कारवाई न करण्यासाठी 'वसुली' केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते बक्षु अमीर शेख यांना टपालाने यासंदर्भात एक माहिती मिळाली. त्यानुसार जिल्ह्यात एसीबीकडून महिन्याला २४ लाखाची वसुली करण्यात येत असून यात तत्कालीन उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे आणि सध्याचे पोलीस निरीक्षक म्हणून एसीबीतच कार्यरत असलेले रवींद्र परदेशी यांच्यावर या वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत.

तत्कालीन उपअधीक्षकांविरुद्ध आरोप -

सदर तक्रार यापूर्वीच गृहमंत्र्यांना करण्यात आली होती. यात तत्कालीन उपअधीक्षक आणि विद्यमान एसीबी बीडच्या निरीक्षकांवर आरोप करण्यात आले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मालमत्तांचा देखील उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आरटीओवर एकही कारवाई नाही -

बीड जिल्ह्यात १९८० पासून बीडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात एकदाही एसीबीचा छापा किंवा सापळा झालेला नाही, असा दावा करण्यात आला आहे. यातूनच एसीबीचे या कार्यालयाशी लागेबांधे असल्याचे समोर येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मागणी समोर येऊनही कारवाई नाही -

दरम्यान आरटीओ कार्यालयात लाच मागितली जात असल्याची तक्रार सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार लाचेची मागणी नोंदविण्यात देखील आली. रेकॉर्डरमध्ये ती नोंद झाली. मात्र नंतर त्या व्यक्तीला याचा संशय आल्याने त्याने लाच घेतली नाही. मात्र त्या अधिकाऱ्यांविरुद्ध लाचेची मागणी केल्याचा गुन्हा अद्याप देखील दाखल झाला नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे.

शेवटपर्यंत पाठपुरावा करणार -

मी अनेक दिवसांपासून एसीबी कार्यालयातील 'वसुलीचा' पाठपुरावा करीत आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणात आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करू. ज्या कार्यालयाने लाच रोखायची तेच कार्यालय बरबटले तर कसे होणार? असा सवाल बक्षु अमीर शेख यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details