बीड- सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर करताना फेरफार सक्ती करू नये, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला बँकांकडून हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर याची दखल घेऊन योग्य तो उपाय आम्हाला करावा लागेल, अशी प्रतिक्रिया बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
शेतकरी बँकेत कर्ज प्रकरण मंजुरीसाठी कागदपत्र घेऊन गेल्यानंतर फेरफार असेल तरच कर्ज प्रकरण मंजूर करू, असे जुन्या खातेदारांना देखील बँका सांगत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचाच परिणाम बीड तहसील कार्यालयात कोरोनाच्या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या फेरफारसाठीच्या रांगा लागत आहेत.