औरंगाबाद - शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना गंगापूर तालुक्यातील पाचपिरवाडी शिवारात सोमवारी दुपारी घडली. स्वप्नील संतोष काळे (१५) व रविंद्र संतोष काळे अशी त्या शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत.
ठिबक सिंचनाच्या नळीने केला घात -गंगापूर तालुक्यातील पाचपिरवाडी शिवारात संदिप श्रीकांत लागू यांची शेती आहे. शेतीच्या कामासाठी टाकळीवाडी येथील विशाल नरोडे हे शेतगडी म्हणून काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वी विशाल यांच्याकडे औरंगाबादेतील त्यांचे मावसभाऊ स्वप्नील संतोष काळे व रविंद्र संतोष काळे हे उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आले होते. सोमवारी दुपारी दोन ते तीन मुलांसोबत ते शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. शेततळ्यात उतरण्यासाठी या मुलांनी ठिबक सिंचनाची नळी बांधून ते पोहण्यासाठी गेले होते. मात्र पोहण्यासाठी तळ्यात सोडलेली ठिबक सिंचनाची नळी तुटली आणि दोघे सख्खे भाऊ एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात बुडाले. त्यांच्याबरोबर असलेल्या मुलांनी आरडाओरडा केला असता, त्यांचा मावसभाऊ विशाल नरोडे यांनी तातडीने लोकांना माहिती देऊन या दोघांना पाण्याच्या बाहेर काढले होते.