औरंगाबाद - लॉकडाऊन ३.० च्या कालावधीत देखील महाराष्ट्रात परप्रांतीय मजूर, कामगार व नागरिकांचे स्थलांतर काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. यात हातावर पोट असलेल्या कुटुंबासह, बांधकाम व रस्ते कामावरील मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अक्षरश: जीव मुठीत घेऊनच या हजारो कूटुंबांचे जथ्थे घराच्या दिशेने, ओढीने उन्हा तान्हाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरची पायपिट करतांना पहायला मिळत आहे. मन हेलावून टाकणारी ही दृष्ये पैठण तालुक्यातील विविध मार्गांवर दररोज बघायला मिळत आहे.
लॉकडाऊन 3.0 इफेक्ट : परप्रांतीय मजुरांची रखरखत्या उन्हातही पायपीट सुरुच! - औरंगाबाद परप्रांतीय मजूर बातमी
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. पण, काही परप्रांतीय प्रवाशांना अद्याप शासनाकडून मदत प्राप्त न झाल्याने अनेक मजुरांची गावाकडची पायपीट सुरुच आहे. पैठण तालुक्यातून विविध मार्गाने पायी जाणाऱ्या परप्रांतीय नागरिकांचे जत्थे दररोज दिसून पडताहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाला अन् परप्रांतीय मजुर आहे तिथेच अडकून पडले. घरची चिंता आणि अडकून पडलेल्या ठिकाणी अन्नपाण्याचा अभाव यासारख्या अडचणींना तोंड देत हे मजुर, कामगार दिवस ढकलत होते. मात्र, दिवसेंदिवस लॉकडाऊन कालावधीत वाढ होत गेली आणि संयमाचा बांध फुटुन अनेक परप्रांतीय कामगार, मजुरांनी पायीच घरची वाट धरली. सोबत खाण्यापिण्याची काहीच व्यवस्था नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर, असंख्य मजूर व कामगार कुटुंबे आपल्या चिमुकल्यांसह मार्गी लागले.
मात्र, जीवन-मरणाच्या वाटेवर असताना प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने या मजुरांची घरवापसी खडतर बनत चालली आहे, असेच म्हणावे लागत आहे. गेल्या आठवड्यात संभाजीनगर-जालना जिल्ह्यातील रेल्वे रुळावर झोपलेल्या परप्रांतीय मजुरांवर भरधाव वेगातील रेल्वेने मृत्युचा घाला घातला होता. त्यामुळे आतातरी, त्यांच्यावर ओढावलेल्या संकटांकडे गंभीरतेने बघून मदत करावी, अशी आस अनेक परप्रांतीय मजुरांकडून पाहावयास मिळत आहे. पैठण शहर व परिसरासह तालुक्यात आज घडीला राज्य व परराज्यातील मजूरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचेही बोलले जात आहे.