छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Maratha Andolan : गेल्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षण मुद्दा थंडावला, असं वाटत असताना वडीगोद्री येथे मनोज पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळं पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालंय. 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी समाजासाठी आंदोलन म्हणून 2016 मध्ये पहिला मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येनं 58 मोर्चे काढण्यात आले. मात्र, नंतर हळूहळू आंदोलनाची पद्धत बदलली, शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. (maratha andolan latest news)
कोपर्डी घटनेनंतर मोर्चे :2016 साली कोपर्डीमध्ये युवतीवर झालेल्या अत्याचारानंतर आंदोलनाची हाक देण्यात आली. 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून काढण्यात आला होता. या मोर्चात पहिल्यांदाच लाखो लोकांनी एकत्र येऊन शांततेत कुठल्याही घोषणा न देता मोर्चा काढून वेगळा आदर्श निर्माण केला. याचप्रमाणं हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत मोठ्या संख्येनं मराठा बांधवांना घेऊन 58 मोर्चे राज्यभरात निघाले. शेवटचा मोर्चा मुंबईमध्ये काढण्यात आला होता. 25 ते 30 लाख लोकांनी यात सहभाग घेत आपल्या वेगवेगळ्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या. (Maratha Andolan news)
मुलींनी केले नेतृत्व : 'मराठा क्रांती मोर्चा' या नावानं पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर शहरातून आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाला कोणतंही नेतृत्व नव्हतं. तरीही शिस्तीत आणि शांततेत मोर्चे निघाले होते. मोर्चाचा समारोप होत असताना युवती त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या. शांत, मात्र आक्रमक पद्धतीचं भाषण करून सरकार दरबारी समाजाच्या अडचणी मांडण्याचं काम करण्यात आलं. यात राजकीय पक्षांशी संबंध असलेले नेते देखील साधारण आंदोलन म्हणून वावरत होते. त्यामुळे आंदोलन करण्याची वेगळी पद्धत समाजात रुळली. या आंदोलनाची नोंद सर्व स्तरातून घेतली गेली. म्हणून मराठा नाही तर इतर समाजाचे नागरिक देखील यात सहभागी होत होते.मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्या या आंदोलनामधून समोर आणल्या गेल्या. मात्र शांत आणि संयमी असलेल्या आंदोलनाची दखल सरकार दरबारी न घेतल्यामुळं आंदोलन हिंसक पद्धतीकडे वळले.
कोणत्याही राजकीय नेत्यांचे नेतृत्व केले अमान्य :मराठा आरक्षण, शिक्षण आणि नोकरी यांच्यासह इतर मागण्यांना घेऊन मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. मात्र या मोर्चाचं नेतृत्व कोणाकडेही नव्हतं. जागोजागी आयोजनाची घोषणा झाल्यानंतर, समाजातील नागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत होते. काही राजकीय नेत्यांकडे याचं नेतृत्व जाईल का? अशी भीती वाटत होती. त्यावेळी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे नेतृत्व देण्याबाबत चर्चा समोर आल्या. मात्र कोणाचंही नेतृत्व नको, अशी भूमिका अनेकांनी घेतली. त्यामुळे आजही या आंदोलनाला कोणतंही एक नेतृत्व मिळालं नाही. आज आंदोलनात सहभागी प्रत्येकजण समन्वयक म्हणून वावरतो. शांततेतील मोर्चे, त्यानंतर हिंसक आंदोलन ते न्यायालयीन लढाई, असा प्रवास या आंदोलनाच्या माध्यमातून सुरू झाला. तरी, आजही न्याय मिळत नाही. राज्यात प्रत्येक पक्ष सत्तेत येऊन गेला मात्र, फक्त आश्वासन मिळालं. त्यामुळेच समाज आक्रमक झाल्याचं सामाजिक अभ्यासकांचा म्हणणं आहे. (Maratha Andolan know in detail)