महाराष्ट्र

maharashtra

ओवैसी माझे 'गॉडफादर'; युतीच्या चर्चेसाठी आजही तयार - इम्तियाज जलील

By

Published : Sep 9, 2019, 5:55 PM IST

Updated : Sep 9, 2019, 8:07 PM IST

इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला आणि मला आघाडी मोडणारा व्हिलन ठरवले जात असल्याचा आरोप केला.

इम्तियाज जलील

औरंगाबाद- वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांच्यात सुंदोपसुंदी सुरू झाल्याचे चित्र समोर येत आहे. वंचितचे नेते बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन वंचित-एमआयएम आघाडी कायम असल्याचे म्हटले आहे. तसेच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांचा नामोल्लेख टाळून आम्ही ओवैसींशिवाय दुसऱ्याच्या बोलण्याला महत्त्व देत नसल्याचा टोला लगावला होता. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार इम्तियाज जलील

हेही वाचा -एमआयएमसोबत आमची युती कायम - अॅड. प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीमधील काही लोक मला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. वंचित आघाडी सोबत जागा वाटपाबाबत कोणीही बोलायला तयार नाही. आम्ही जे पत्र काढले ते पक्षाचे अध्यक्ष ओवैसींना विचारूनच काढले, असल्याचे स्पष्टीकरण इम्तियाज जलील यांनी दिले आहे. वंचित आघाडीमध्ये संघाचे लोक आले असल्याचा आरोप देखील जलील यांनी केला.

हेही वाचा -'इम्तियाज जलीलांच्या वैयक्तिक महत्त्वकांक्षेमुळे वंचित, एमआयएममध्ये बेबनाव'

वंचित आघाडीकडून देऊ केलेल्या 8 जागा आम्हाला अमान्य आहेत. अजूनही त्यांनी जागा वाढवून दिल्या तर आम्ही सोबत राहू. मात्र, तसे होत नसल्यास एमआयएम पक्ष उमेदवार चाचपणीसाठी मंगळवार पासून मुलाखती घ्यायला सुरुवात करणार असल्याचे जलील यांनी सांगितले. यामध्ये औरंगाबाद, मालेगाव, पुणे, नांदेडसह इतर जागांसाठी मुलाखती घेणार असल्याचे जलील यांनी स्पष्ट केले.

ज्या जागांवर आमची ताकद जास्त आहे. त्या ठिकाणी निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे 100 जागा मागितल्या होत्या. मात्र, प्रचार करणे शक्य होणार नसल्याने आम्ही जागा कमी केल्या. कमीत-कमी जागांवर निवडणूक लढवून चांगला निकाल मिळावा, अशी अपेक्षा होती. म्हणून आम्ही वंचितला 76 जागांची मागणी केली. वंचित सोबत बैठका झाल्या. मात्र, जागा वाटप झाले नाही. वंचितकडून जागा वाटपबाबत योग्य उत्तरे मिळाली नाहीत. ते 76 जागा द्यायला तयार नव्हते, आम्ही कमी करायला तयार होतो. मात्र, अचानक आंबेडकर ओवैसींसोबत बोलेन, असे सांगितले.

पुण्यामध्ये आंबेडकर आणि ओवैसींची बैठक झाली. त्यावेळी आंबेडकर 2 दिवसात कळवतो म्हणाले. मात्र, तसे झाले नाही. नंतर त्यांनी फक्त 8 जागा देऊ केल्या. महाराष्ट्रात आमचे 150 नगरसेवक आहेत. त्यामुळे आमची ताकत जास्त आहे, असेही जलील म्हणाले.

ओवैसी माझ्यासाठी गॉड फादर आहेत. त्यांनी सांगितले तर प्रदेशाध्यक्ष पदाचा आणि खासदारकीचा देखील राजीनामा देईल. त्यांचा मी आदर करतो, असे देखील इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. आजही आम्ही कोणत्याही परिस्थितीत 8 जागा मान्य करणार नाही. उत्तर मिळत नसल्याने उद्यापासून मुलाखती घेऊन, उमेदवारी जाहीर करणार, उद्या संध्याकाळपर्यंत काही जागांवर उमेदवारी जाहीर होईल, असे जलील याांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत 40 ते 50 जगापेक्षा कमी जागा आम्हाला मान्य नसतील, असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Sep 9, 2019, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details