औरंगाबाद- जी रेल्वे जिवंतपणी मिळायला हवी होती ती मेल्यावर मिळाल्याचे दुर्दैवी दृश्य औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळाले. शुक्रवारी रेल्वेने चिरडलेल्या मध्यप्रदेशच्या त्या सोळा जणांचे मृतदेह रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले.
राज्यात अनेक मजुरांनी आपले गाव जवळ करण्यासाठी शक्य होईल ते प्रयत्न केले. कोणी परवानगी मागितली कोणी पायी तर कोणी सायकलवर, काही जणांनी टँकमधून प्रवास करत आपल्या राज्यात जाण्याचा मार्ग निवडला. असाच काहीसा प्रयत्न जालना जिल्ह्यात स्टील कंपनीत काम करणाऱ्या 20 मजुरांनी स्वीकारला. मात्र काळाने घाला घातला आणि या मजुरांचे नुसते शरीर पोहचले, आत्मा मात्र रेल्वे रुळावरच सुटला.
मध्यप्रदेशच्या अडकलेल्या मजुरांना परत पाठवण्यासाठी औरंगाबादमधून विशेष रेल्वे सोडण्यात आली. रविवारी 1200 लोक आपल्या राज्यात परत गेले असताना शुक्रवारी परत 1200 लोक आपल्या घरी परत जाणार होते. त्यामुळे अनेक मजुरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. याच दरम्यान, लॉकडाऊनच्या काळातील देशातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना औरंगाबादच्या करमाड जवळ घडली. जालन्यातील स्टील कंपनीत काम करणारे मजूर रेल्वे रुळावरून पायी जात असताना त्यांनी घेतलेली क्षणभर विश्रांती 16 कुटुंबाला उद्धवस्त करून गेली. जालन्याहून 45 किलोमीटर पायी चालत आल्यावर थकलेले मजूर रेल्वे रुळावर झोपले ते कायमचे. सकाळी पाचच्या सुमारास रेल्वे मालगाडीच्या धडकेत 16 मजूर जागीच ठार झाले. रेल्वे रुळावर शरीराचे तुकडे विखुरले गेले. पडलेले शरीराचे अवयव कोणते कोणाचे हे देखील ओळखणे अवघड झाले होते.
जिवंत असताना हवी असलेली रेल्वे मेल्यावर मिळाली, मृत मजुरांचे शव मध्य प्रदेशला रवाना - औरंगाबाद रेल्वे अपघात
जी रेल्वे जिवंतपणी मिळायला हवी होती ती मेल्यावर मिळाल्याचे दुर्दैवी दृश्य औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळाले. शुक्रवारी रेल्वेने चिरडलेल्या मध्यप्रदेशच्या त्या सोळा जणांचे मृतदेह रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले.
![जिवंत असताना हवी असलेली रेल्वे मेल्यावर मिळाली, मृत मजुरांचे शव मध्य प्रदेशला रवाना deadbodies of migrant workers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7121752-810-7121752-1588988799637.jpg)
अपघात झालेल्या ठिकाणच्या परिसरातील गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी विखुरलेले तुकडे जमा केले गोळा केले. हे काम करत असताना मदतकार्य करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. करण पडलेल्या सामानात काही मजुरांच्या कुटुंबियांचे फोटो या मासांच्या तुकड्यांसोबत विखुरलेले आढळले. काही लोकांनी शरीराचे तुकडे जमा केले तर कोणी विखुरलेले सामान ज्यामध्ये जेवणासाठी आणलेल्या पोळ्या-भाजी देखील होते. ज्या भाकरीसाठी आलो त्याच भाकरी शेवटी खाता आल्या नाहीत. सर्व साहित्य स्थानिकांनी जड अंतकरणाने जमा केले.
सायंकाळी या सर्वांचे मृतदेह रेल्वेने मध्यप्रदेशला पाठवले. जिवंत असताना गावी जाण्यासाठी परवानगी मागणाऱ्या या मजुरांना मेल्यावर विना परवानगी गावी पाठवण्याची सोय झाली. जिवंतपणी नाही पण मेल्यावर गावी जायला गाडी भेटली इतके दुर्दैवी हे मजूर राहिले. हीच गाडी आणि अशीच परवानगी काही दिवस आधी मिळाली असती तर या रेल्वेत मृत कामगार नाही तर जिवंत कामगार आपल्या गावी पोहचले असते. आज गावात दुःखाचे नाही तर आनंदाचे वातावरण असते. मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाच्या दिरंगाईमुळे अनेक कुटंब उद्धवस्त झालेत. आता तरी परवानग्यांची ही औपरिकता न करता जाणाऱ्यांचे मार्ग मोकळे केले तर करमाड सारखी घटना पुन्हा होणार नाही हे नक्की.