औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या नामकरणाबाबत केंद्राने हिरवा कंदील दिला. मात्र त्यातील शब्दांचा खेळ पाहता नाव बदल शहराचा केला की पूर्ण जिल्ह्याचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने काढलेल्या पत्रकानुसार शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. त्यात जिल्हा औरंगाबाद असे नमूद करण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामध्ये दिलेले नाव औरंगाबाद तालुक्यापुरते मर्यादित आहे की, जिल्ह्याचे पूर्ण नाव बदलले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेना - भाजपकडून जल्लोष : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णय केंद्र सरकारने दिल्यानंतर, जिल्ह्यात सर्वत्र जल्लोष करण्यात आला. टीव्ही सेंटर भागात शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री संदिपान भुमरे आणि भाजप आमदार तथा कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. तर दुसरीकडे उद्धव गटाच्या नेत्यांनी मात्र बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या घोषणेनंतर जवळपास 35 वर्षांनी नामकरण प्रश्नावर केंद्राने पहिल्यांदा घोषणा केली. त्यावर भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाने आनंद व्यक्त केला.
संभाजीनगर या नावाची घोषणा : 9 मे 1988 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर या नावाची घोषणा केली होती. दोन वेळा शिवसेनेच्या महापौरांनी महानगरपालिकेकडून हा प्रस्ताव पाठवला होता. मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला मान्य केले. याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो असे विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले. तर हे श्रेय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचचे आहे.