औरंगाबाद -दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील छावणी, रोजाबाग, उस्मानपुरा या तीन ईदगाहमध्ये मुस्लीम बांधवांनी ईद-उल-फित्रची (रमजान ईद) मुख्य नमाज अदा केली. तसेच एकमेकांना गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी आबालवृद्धांची उपस्थिती होती.
आज सकाळी सात वाजल्यापासूनच मुस्लीम बांधवानी लाखोंच्या संख्येने शहरातील छावणी ईदगाह मैदानात हजेरी लावली. साधारण नऊ वाजेच्या सुमारास मुख्य नमाजाला सुरुवात झाली. यावेळी देशाच्या, शहराच्या सुरक्षिततेसाठी, शेतकऱ्यांसह पावसासाठी लाखो बांधवांनी प्रार्थना केली. नमाज आणि पार्थना संपल्यानंतर सर्व बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
माझ्यासह औरंगाबादच्या नागरिकांनी मी खासदार झालो तेंव्हा आणि आज अशी दोनदा ईद साजरी केली. पहिल्यांदा रमजानच्या पवित्र महिण्यात दोन वेळा ईद साजरी करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. दरम्यान त्यांनी सर्व जनतेस ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईदगाह मैदानात आलेल्या बहुतांश बांधवांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते. यावेळी मंचावर नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपयुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष नामदेवराव पवार, नवीन ओबेरॉय, माजी महापौर अशोक सायण्णा, रशीद मामु, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, शेषराव उदार, छावणीचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे सह मान्यवरांची उपस्थिती होती.
पोलिसांची कडेकोट सुरक्षा
ईद-उल-फित्र शांततेने पार पडावा यासाठी औरंगाबाद शहर पोलिसांनी मोठी खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबादेतील तीन प्रमुख ईदगाह तसेच लहान-मोठ्या मशिदी, तसेच पारंपरिक आणि ऐतिहासिक मशिदीजवळ पोलिसांनी फिक्स पॉईंट लावले होते. त्याचबरोबर (क्यू.आर.टी.) शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेचे कर्मचारी, विशेष शाखा व पोलीस ठाणे स्थरावर चौका चौकात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.