वैजापूर (औरंगाबाद) : वैजापूर तालुक्यातील विरगाव या गावाने आपल्या परंपरेनुसार होत असलेल्या यात्रेनिमित्त एक आदर्श घडवला आहे. एकविरामाता यात्रा, राजबक्षर बाबा ऊरुस, रामनवमी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या सर्व उत्सवांचे औचित्य साधून विरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्त संकलन दत्ताजी भाले रक्तपेढी औरंगाबाद यांनी केले. या शिबिराची सुरुवात रामभाऊ महाराज बर्डे (सराला बेट), प्रभाकर बारसे (मा.उपसभापती पं.स. वैजापूर) यांच्या हस्ते करण्यात आली.
'कोरोनाच्या वाढत्या महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशा कठीण काळात एक चांगला उपक्रम राबवून आपण सरकारला माझी जबाबदारी म्हणून मदत करीत आहेत. एक रक्तदाता तिघांचे जीव वाचवितो म्हणून रक्तदान शिबिर हा सुत्य उपक्रम आहे', असे आदर्श शिक्षक प्रभाकर बारसे म्हणाले. रक्तदान शिबिर हे खऱ्या अर्थाने उत्सवांचे जीर्णोद्धार आहे, असे रामभाऊ महाराज यांनी सांगितले. प्रभाकर बापू बारसे यांनी युवकांचे कौतुक करून मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करावा, स्वच्छ हात धुवावे, सोशलडिस्टींग पाळावे व अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आव्हान केले.