छत्रपती संभाजीनगर: केंद्र सरकारने एक परिपत्रक जारी करून त्यांनी औरंदाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले आहे. त्यामुळे राज्यात सर्व ठिकाणी जल्लोष पहायला मिळत आहे. औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय हा शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा होता, कारण 1988मध्ये हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनीसर्वप्रथम औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. चला जाणून घेवूयात संभाजीनगरच्या नामांतराचा संपूर्ण इतिहास..
बाळासाहेबांची 35 वर्षांपूर्वीची घोषणा : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम १९८८ रोजी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत औरंदाबादच्या नामांतरणाची घोषणा केली होती. 1988 साली शिवसेनेने औरंगाबाद महापालिका निवडणुकीत इंट्री केली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल एक-दोन नव्हे तर २७ नगरसेवक निवडून आले होते. पण ३ नगरसेवकांअभावी शिवसेनेची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. मात्र, शिवसेनेने पहिल्याच निवडणुकीत तिथल्या लोकांच्या मनात स्थान प्राप्त केले होते. शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळवले होते. ८ मे १९८८ रोजी झालेल्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणार अशी घोषणा केली होती.
औरंगाबाद नव्हे संभाजीनगर म्हणा : सभेत बाळासाहेबांनी जोरदार भाषण केले. इतकेच नाही तर आजपासूनच संभाजीनगर म्हणा, अशी सूचना शिवसैनिकांना केली होती. तेव्हापासून शिवसेनेकडून संभाजीनगर असाच उल्लेख केला जातो. पुढे काही महिन्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडूनदेखील औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख सुरु झाली. शिवसेनेची ताकद म्हणून कायम शिवसेना नेत्यांकडून संभाजीनगरच्या नावाचा आग्रह राहिला. त्यानंतरच औरंगाबादचे सर्व राजकारण 'संभाजीनगर' नावाभोवती फिरू लागले. सर्व पक्ष मतांसाठी संभाजीनगर नाव बदलणार अशा घोषणा करू लागले.
नावावरून राजकारण : 1988 नंतर झालेल्या सर्व लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूका संभाजीनगर नावाभोवती शहरातल्या इतर मुद्द्यासोबत फिरू लागल्या. त्य़ामुळे शिवसेनेला औरंगाबाद शहरातून मोठे यश मिळत गेले. राज्यात शिवसेनेची सत्ता आली की संभाजीनगर नामकरण करू असे शिवसेनेकडून आश्वासन दिले गेले होते.मात्र या गोष्टीला भरपूर वेळ लागला. शवसेनेला त्यावेळी भाजपचा देखील पाठिंबा मिळाला.