महाराष्ट्र

maharashtra

पत्रकाराला आमदार करणारा 'औरंगाबाद मध्य मतदारसंघ'

By

Published : Sep 20, 2019, 9:16 PM IST

Updated : Sep 20, 2019, 9:46 PM IST

आधी काँग्रेस आणि नव्वदच्या दशकानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या औरंगाबादमध्ये, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय भूंकप झाला. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून पूर्वाश्रमीचे पत्रकार असलेल्या सय्यद इम्तियाज जलिल यांनी, एआयएमआयएम पक्षातर्फे निवडणूक लढत विजय मिळवला.

सय्यद इम्तियाज जलिल

औरंगाबाद - राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय भूंकप झाला. आधी काँग्रेस आणि नव्वदच्या दशकानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला अशी औरंगाबादची ओळख! पण २०१४ च्या निवडणुकीनंतर सगळीच गणिते बदलली.

केवळ हैदराबाद आणि आजूबाजूच्या परिसरात अस्तित्त्व असलेला एआयएमआयएम अर्थात मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन या पक्षाने मुंबईच्या भायखळा आणि औरंगाबाद मध्य अशा दोन विधानसभा मतदारसंघात विजय मिळवत आपले दोन आमदार पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत पाठवले. भायखळ्यातून अॅड. वारीस पठाण तर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून पुर्वाश्रमीचे पत्रकार असलेल्या सय्यद इम्तियाज जलिल यांनी विजय मिळवला. महाराष्ट्राच्या राजकारणातील हे मोठे स्थित्यंतर होते. पुर्णपणे मुस्लिम तोंडवळा असलेला हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आला होता.

हेही वाचा : उद्धव ठाकरे म्हणतात आमचं ठरलंय, पण पाटील म्हणतात अजून ठरायचंय

एआयएमआयएमने विजय मिळविलेल्या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एक होता मुंबईतील भायखळा विधानसभा आणि औरंगाबाद शहरातील तीनपैकी एक असलेला औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ. २०१४च्या निवडणुकीपर्यंत येथे शिवसेनेचा उमेदवार निवडून येत होता. अपवाद २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेने विकास जैन यांना उमेदवारी दिल्यामुळे मराठवाड्यातील निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेल्या प्रदीप जैस्वाल यांनी बंडखोरीचे निशान फडकवत आमदारकीची निवडणूक लढवली होती. आणि अपक्ष उमेदवार म्हणून विजयही मिळवला होता. अखेर पाच वर्षाच्या आतच बंडखोरीची तलवार म्यान करत २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. दरम्यान या निवडणुकीपुर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीने स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. आणि या मतदारसंघाची गणिते बदलली. सिंधी, गुजराती, मारवाडी हे हिंदू व्यापारी समूह आणि मुस्लीम अशा मिश्र लोकसंख्येचा हा मतदारसंघ. पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा हा परिसर.

हेही वाचा : मनसे निवडणूक लढण्याची शक्यता, राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

शिवसेनेकडून प्रदिप जैस्वाल, ऐनवेळी शिवसेनेचा भगवा सोडून भाजपचे कमळ हाती घेतलेले किशनचंद तनवाणी आणि एआयएमआएमकडून मैदानात उतरलेले, पत्रकारीतेच्या क्षेत्रात नावलौकीक मिळवलेले सय्यद इम्तियाज जलिल अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. जैस्वाल-तनवाणी मतविभाजनाचा फायदा घेत सर्व राजकीय आडाखे बाजूला सारत जलिल यांनी पहिल्याच फटक्यात विजय मिळवला. एकगठ्ठा मिळालेलं मुस्लिम मतदान आणि स्वच्छ, उच्चशिक्षित उमेदवार अशी ओळख जलिलांच्या पथ्यांवर पडली. २०१४ ला झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रदीप जैस्वालांना ४१, ८६१ मते तर ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढविलेल्या किशनचंद तनवाणी यांना ४०,७७० मते मिळाली होती. या दोघांमधील मतविभाजनाचा फायदा घेत इम्तियाज जलिलांनी ६१, ८४३ मते मिळवली होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निसटत्या फरकाने जलिलांच्या गळ्यात औरंगाबादच्या खासदारकीची माळ पडली. त्यामुळे त्यांच्याजागी एआयएमआयएम कोणाला उमेदवारी देते हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेचे स्वंतत्र्यरीत्या लढायचे की युतीकरुन हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे युतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. काँग्रेस- राष्ट्रवादीचेही उमेदवारीसंदर्भातील चित्र अजून स्पष्ट नाही. त्यामुळे येथून कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.

हेही वाचा : मी अजून म्हातारा झालेलो नाही, माझी ताकद काय आहे, हे मी दाखवून देईल- शरद पवार

Last Updated : Sep 20, 2019, 9:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details