औरंगाबाद- आंध्रप्रदेशमधून शहरात गांजा आणून विक्री करणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्हेशाखा पोलिसांनी रविवारी पहाटे सापळा रचून दोन संशयित आरोपींना गजाआड केले. तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी ३७ किलो ३०० ग्रॅम गांजासह १२ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे.
पोलिसांची कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत लक्ष्मण बनसोडे (३१), जगन्नाथ श्रीमंत लाटे (३६) दोघे रा.चौधरी कॉलनी,चिकलठाणा अशी संशयित आरोपींची नावे आहेत. एक संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यास यशस्वी झाला आहे. भिकन कडूबा रिठे (रा. चिकलठाणा बाजारतळ) असे पसार झालेल्या संशयिताचे नाव आहे. कार क्रमांक (एमएच २० एए-४४१३) मधून आंध्रप्रदेशातील दाराकोंडा येथून, चार व्यक्ती गांजा घेऊन शहरात येत असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलिस अंमलदार ओमप्रकाश बनकर, विरेश बने, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, बबन ईप्पर दादासाहेब झारगड आदींच्या पथकाने केंब्रिज चौकात सापळा लावला होता. पोलिसांना पाहताच कार चालकाने कार बीड बायपासवरून जुन्या व बंद असलेल्या वळण रस्त्याने चिकलठाण्याकडे घातली. पोलिसांनी कारचा पाठलाग करून गोपालनगर येथे कार अडवले. व त्यांची चौकशी केली.
१ लाख ८६ हजाराचा मुद्देलामल जप्त
पोलिसांनी श्रीकांत बनसोडे, जगन्नाथ लाटे या दोघांना ताब्यात घेत कारची झडती घेतली असता, १ लाख ८६ हजार ५०० रुपये किंमतीचा ३७ किलो ३०० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी कार, गांजा, एक मोबाईल असा एकूण १२ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-अमरावतीत 366 किलो अवैध गांजा जप्त