महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'काँग्रेससोबतची युती तोडल्याशिवाय शिवसेनेचा प्रचार करणार नाही'

शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. मात्र, आता सेना-भाजपची युती झाल्याने काँग्रेससोबतची युती तोडल्याशिवाय शिवसेनेचा प्रचार न करण्याची भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

By

Published : Mar 8, 2019, 9:28 PM IST

शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे

औरंगाबाद- जिल्हा परिषदेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असतानाही शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेपासून दूर राहिला. मात्र, आता सेना-भाजपची युती झाल्याने काँग्रेससोबतची युती तोडल्याशिवाय शिवसेनेचा प्रचार न करण्याची भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माहिती देताना भाजप पदाधिकारी


औरंगाबाद जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे. सर्वाधिक जागा घेणाऱ्या भाजपला बाजूला ठेवून विरोधक असलेल्या काँग्रेसला हाताशी घेऊन शिवसेनेने जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप - 23, शिवसेना - 19, काँग्रेस - 18, राष्ट्रवादी - 1, असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, आता हीच सत्ता शिवसेनेला अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेने काँग्रेससोबत असलेली युती तोडण्याची मागणी भाजपने केली आहे. अभद्र युती तोडणार नाही, तोपर्यंत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप जिल्हा परिषद सदस्यांनी घेतल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेतील युती ही त्या वेळच्या परिस्थितीनुसार झालेली आहे. मात्र, आता अचानक युती तोडणे बरोबर नाही. त्यामुळे आता नाही पण दोन महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत आम्ही भाजपसोबतच युती करू असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. नगरमध्ये भाजपने असेच केल्याचा टोला लावत ती युती तोडण्याची अप्रत्यक्ष मागणी सेनेने केली.


औरंगाबादेत शिवसेना आणि भाजपची सर्वात जुनी युती आहे. महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून सेना-भाजपची युती आहे. मात्र, जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा मिळवून देखील जिल्हा परिषद अध्यक्षपद ठेवण्यासाठी सेनेने अभद्र युती केल्याचा राग भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे लोकसभेच्या निमित्ताने भाजप जिल्हा परिषदेत दबावतंत्र वापरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सेनेसमोर वेगळा पेच निर्माण झाला हे नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details