महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 2, 2023, 8:03 PM IST

ETV Bharat / state

Water Bowls For Wild Birds : पक्ष्यांनाही लागते तहान; जंगलातील पाखरांसाठी जलपात्र; बालकलावंत श्रीनिवास पोकळेचा उपक्रम

रखरखत्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून अमरावती शहरालगत असणाऱ्या जंगलातील पाणवठे आटायला लागले आहे. अशा परिस्थितीत पाखरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जंगल परिसरात मातीची जलपात्र लावून त्यात नियमित पाणी टाकण्याचा उपक्रम राबवून पाखरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. नाळ चित्रपटातील बालकलावंत चैत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे हा देखील या उपक्रमात सहभागी झाला आहे.

Water Bowls For Wild Birds
जलपात्र

पक्ष्यांसाठी लावलेले जलपात्र

अमरावती:अमरावती शहरालगत छत्री तलाव परिसराच्या मागे घनदाट जंगल आहे. तसेच वडाळी, पोहरा, चिरोडी हे देखील मोठे जंगल आहे. या जंगल परिसरात विविध प्रजातीचे पक्षी आहेत. या पक्षांना या जंगलामध्येच उपलब्ध असणारे नैसर्गिक पाणवठे हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. आता उन्हामुळे मात्र जंगलातील सर्व झाडांची पान गळती झाली असून पाण्याचे स्त्रोत देखील आटले आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात जंगलातील जवळपास सर्वच पाण्यांचे स्त्रोत कोरडे होतील अशी अवस्था आहे. यामुळे जंगलातील पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे याकरिता वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटीच्या वतीने गत दहा वर्षांपासून जंगलामध्ये विविध झाडांना जलपात्र लावण्याचा उपक्रम राबविला जात आहे.

पात्रात पाणी ठेवण्याचे कर्तव्य: यावर्षी देखील छत्रीतला परिसरात 100 पेक्षा अधिक ठिकाणी जल पात्र लावण्यात आले आहे. पोहरा जंगल परिसरात देखील अनेक ठिकाणी झाडांना जलपात्र लावण्यात येत आहेत. पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राबविल्या जाणाऱ्या ह्या महत्त्वपूर्ण उपक्रमात बाल कलावंत श्रीनिवास पोकळे देखील सहभागी झाला आहे. तो गत तीन वर्षांपासून या उपक्रमाशी जुळला आहे. श्रीनिवास सोबतच त्याचे वडील देखील या उपक्रमात आनंदाने सहभाग घेतात. या उपक्रमात पर्यावरण आणि पक्षीप्रेमींनी सहभागी होऊन अमरावती शहरालगतच्या जंगलात पक्षांसाठी असे जलपात्र लावण्याचे आवाहन श्रीनिवास पोकळे येणे ईटीव्ही भारतशी बोलताना केले. जलपात्र लावूनच सर्व होणार नाही तर त्यामध्ये नियमित पाणी भरणे देखील आमचेच कर्तव्य असल्याचे श्रीनिवास पोकळे म्हणाला.


शेकडो नागरिकांचा सहभाग:छत्री तलाव परिसरात 100 च्या वर झाडांना जलपात्र लटकविण्यात आले आहेत. या भागात पहाटे आणि सायंकाळी शेकडो अमरावतीकर फिरायला जातात. विशेष म्हणजे फिरायला येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या घरूनच बाटल्यांमध्ये पाणी भरून येते. जंगल परिसरात लटकवण्यात आलेल्या जलपात्रांमध्ये प्रत्येक जण पाणी टाकतो. छत्रीतलाव पासून काही अंतरावर असणाऱ्या हापसीचे पाणी देखील अनेकजण कॅनमध्ये भरून पाडावर लटकवण्यात आलेल्या जलपात्रांमध्ये पाणी भरतात. अमरावती-चांदुर रेल्वे मार्गदरम्यान पोहऱ्याच्या जंगलात देखील अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या जलपात्रांमध्ये या मार्गावरून जाणारे नागरिक थांबून आपल्या जवळचे पाणी टाकतात.

घरोघरीही असावेत जलपात्र:शहरालगतच्या जंगल भागात पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून जलपात्र लावण्याचा उपक्रम राबविला जात असतानाच घरोघरी देखील असे जलपात्र असायला हवे. प्रत्येकाने आपल्या घरी लावलेल्या जलपात्रात नियमित पाणी टाकले तर घराच्या परिसरात येणाऱ्या पक्षांना या रखरखत्या उन्हात आपली तहान भागवण्यास मदत होते असे वाइल्डलाइफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटीचे प्रमुख निलेश कंचनपुरे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. आमच्या संस्थेप्रमाणेच इतर आणखी संस्था या उपक्रमाशी जुळले आहेत. अमरावती करांमध्ये आता पक्षांसाठी जलपात्र लावण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. राज्यभरातील पक्षांची तहान भागवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जलपात्र अभियान राबविणे अत्यंत गरजेचे असल्याचे देखील निलेश कांचनपुरे म्हणाले.

हेही वाचा:Rape Case Against Lowyer : तरुणीच्या मदतीने बनवले हनीट्रॅप, खंडणीही उकळली अन् 'तिच्यावरच' केला बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details