महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Student Struggle Story: एमबीबीएसला प्रवेश घेतलेल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता शेतकरी पित्याचा संघर्ष, जमीन विक्रीकरिता केली तयारी

आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, उच्चपदस्थ व्हावे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. त्यासाठी ते जीवाचा आटापिटा करत असतात. सध्या अशीच धडपड अमरावती जिल्ह्यातील एका पित्याची आपल्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी सुरू आहे. मुलाच्या शिक्षणासाठी ते हाती असलेले सगळेच विकायला तयार आहेत. काही झाले तरी आपल्या मुलाचे डॉक्टरकीचे स्वप्न पूर्ण करायचे, असा पणच या बापाने आपल्या लेकरासाठी घेतला आहे.

By

Published : Jul 24, 2023, 10:25 AM IST

Updated : Jul 24, 2023, 12:22 PM IST

Student Struggle Story
मुलाचे डॉक्टरकीचे स्वप्न

वडिल आणि मुलाची प्रतिक्रिया

अमरावती :शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डी या गावातील ईश्वर अढाऊ यांचा मुलगा ऋत्विक हा किर्गीस्तान येथील ओश स्टेट युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याने 2021 मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला असून त्याचे दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण, राहण्याचा आणि इतर खर्च भागवण्यासाठी शेतकरी व शेतमजूर असलेले अढाऊ यांनी त्यांच्याकडील चार एकरपैकी दोन एकर शेती विकली आहे. शेती विकून आलेल्या पैशांमधून ऋत्विकचे दोन वर्षाचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. परंतु आता मात्र पुढील शिक्षणाची फी भरण्याकरिता पैसेच नसल्याने वडिलांपुढे मोठे संकट ठाकले आहे. अढाऊ यांनी आपल्या नातेवाईक तसेच मित्र मंडळीकडून सुद्धा याआधीच मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आहेत. अशातच आता पुढील शिक्षणाचा खर्च कसा भागवावा? या एकाच प्रश्नाने ते चिंतित आहेत.


भूमीहीन होणे हाच एक पर्याय :कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला डॉक्टर करायचे. काही झाले तरी आपल्या मुलाचे डॉक्टरकीचे स्वप्न पूर्ण करायचे, ही महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या ईश्वर यांनी खासदार नवनीत राणा यांना निवेदन देऊन विशेष निधीमधून काही तरतूद करण्याची विनंती केली आहे. परंतु मुलाच्या शिक्षणासाठी काहीच तजवीज झालीच नाही, तर उरलेली दोन एकर शेती विकण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नसल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.


मुलाचे डॉक्टरकीचे स्वप्न :ईश्वर अढाऊ यांना दोन मुले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या चार एकर शेतीतून ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. परंतु त्यापैकी दोन एकर शेती त्यांनी या आधीच विकली आहे. आता मात्र मुलाचे डॉक्टरकीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आमच्या कुटुंबाला जगवणारी जमीन विकावी लागत आहे, याचे वाईट वाटत आहे. पण दुसरीकडे माझा मुलगा डॉक्टर होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे ईश्वर यांनी सांगितले. 3 हजार लोकसंख्या असलेल्या मार्डी गावातून बौद्ध समाजाची ५० ते ६० घरे आहेत. या समाजातून अजूनपर्यंत कोणीही डॉक्टर झाले नाही. समाजातून पहिला डॉक्टर होण्याचे स्वप्न ऋतिकच्या माध्यमातून पूर्ण होत आहे, समाजाला याचा आनंद असल्याचे ईश्वर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

  1. Pratibha Vathore : आई-वडिलांचे छत्र हरपले, भावाची पण साथ सुटली.. मात्र न डगमगता तिने 'नीट' मध्ये मिळवले यश!
  2. Nagpur University Convocation : नागपूर विद्यापीठात सर्वाधिक मेडल प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींनी सांगितला सफलतेचा मंत्र
  3. MPSC Exam Result : वा रे पठ्ठ्यांनो! ऊस तोड करता-करता केला अभ्यास अन् झाले अधिकारी
Last Updated : Jul 24, 2023, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details